मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Confluence of Sanatan and Sikhism is Ayodhya) अयोध्या हे सनातन आणि शीख धर्माचे पवित्र संगमस्थान आहे, असे मत केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केले. नुकतेच त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर व शरयू तीरावरील ऐतिहासिक गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यादरम्यान त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अयोध्येस भगवान श्रीराम आणि तीन शीख गुरु साहिबांचा आशीर्वाद लाभल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी महाराज १५१०-११ मध्ये अयोध्येत आले होते, नववे गुरु गुरु तेग बहादूर जी १६६८ मध्ये अयोध्येत आले आणि गुरु गोविंद सिंग जी १६७२ मध्ये अयोध्येत आले होते. शरयू तटी असलेले गुरुद्वारा हे धर्मांचा संगम, मध्ययुगीन काळापासून शीख आणि हिंदू धर्म यांच्यातील मजबूत संबंध आणि आक्रमणकर्त्यांशी लढण्यासाठी दोन्ही धर्म एकमेकांच्या पाठीशी कसे उभे राहिले याचे प्रतिबिंब आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, १६९७ मध्ये औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली आक्रमक मुघल सैन्याने अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला केला, तेव्हा गुरू गोविंद सिंग यांनी लढण्यासाठी ४०० निहंग शिखांची बटालियन पाठवली होती.