कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव "कवितांचे गाव" म्हणून घोषित
01-Mar-2025
Total Views | 27
मुंबई : ज्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्य उजळून निघाले असे विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जन्मभूमी असणारे शिरवाडे वणी हे गाव ' कवितांचे गाव ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, दिलीपकाका बनकर, शोभा बच्छाव, हेमंत टकले, भाऊ चौधरी तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची नात पियू शिरवाडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन करून, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सदर कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांची असलेली लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करणारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. शिरवाडे वणी आता “कवितांचे गाव” म्हणून ओळखले जाणार असून हाती घेतलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरेल असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर, साहित्यीकांसाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा यानंतर पहिल्याच वर्षी हा उपक्रम राबविला गेला ही मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे असे ते म्हणाले.