दिल्लीकरांवरचे 'आप'चे संकट दूर! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
08-Feb-2025
Total Views | 69
मुंबई : गेली १० वर्षे असलेले दिल्लीकरांवरचे 'आप'चे संकट दूर झाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या विजयाच्या मार्गावर असून आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेले 'आप'चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही 'आपदा' टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केले आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे."