इये मराठीचिये नगरी।
ब्रह्मविद्येचा सुकाळु करी॥
देणे घेणे सुखचि वरी।
होऊ देई या जना॥
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला नगराची उपमा दिलेली आहे. ‘अभिजात भाषा’ म्हणून गौरवण्यात आलेल्या आपल्या मराठी भाषेला समजून घेताना, या नगराच्या अंतरंगाशी एकरूप होणेदेखील तितकेच गरजेचे. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. काळाच्या पटलावर मराठी भाषासुद्धा अशाच वेगवेगळ्या प्रवाहांमुळे समृद्ध होत गेली. अशा या आपल्या लाडक्या मराठी भाषेला दीड हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. इ. स. ५००-७०० पासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यांमधून मराठी उत्क्रांत होत गेली. त्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा हा थोडक्यात आढावा.
- इ. स. १११६-१७ : कर्नाटक येथील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या मूर्तीजवळील ‘श्रीचावुण्डराजें करवियलें’, ‘श्रीगंगराजे सुत्ताले करवियले’ असे कोरलेला मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो.
- इ. स. ११८८ : मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ लिहिला.
- इ. स. १२९० : संत ज्ञानेश्वरांकडून ‘ज्ञानेश्वरी’ची रचना.
- इ. स. १६७६-७७ : छत्रपती शिवरायांच्या आज्ञेनुसार ‘राज्यव्यवहारकोशा’ची निर्मिती.
- इ. स. १८३२ : मराठीतील पहिले नियतकालिक ‘दर्पण’ प्रकाशित.
- इ. स. १८५७ : बाबा पद्मनाजी लिखित ‘यमुना पर्यटन’ ही मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते.
- दि. १ मे १९६० : संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी होऊनमुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती.
- दि. १९ नोव्हेंबर १९६० : ‘महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळा’ची स्थापना.
- दि. ३ ऑक्टोबर २०२४ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर.
(संकलन : मुकुल आव्हाड)