अंजलीताईंनी पुन्हा एकदा अर्धवट...; मंत्री धनंजय मुंडेंकडून आरोपांचे खंडन
20-Feb-2025
Total Views | 35
मुंबई : अंजलीताई दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून केलेले आरोप चुकीचे आहेत, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. धनंजय मुंडे यांनी खोटे पत्र लिहून ११ ऑक्टोबर रोजी जीआर काढून घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता.
यावर उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, "अंजलीताई दमानिया यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून काही जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे आहेत. त्या आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे सातत्याने खोटे आरोप करत आहेत. शासनाच्या कार्य नियमावलीनुसार (रुल्स ऑफ बिजनेस) जीआर अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे, त्यासाठी प्रक्रिया आखून देण्यात आलेली आहे . विभागातील कक्ष अधिकाऱ्याने त्या प्रकरणाची फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांचे मार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेस्तव येत असते, मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे आय ए एस अधिकारी स्वतः ती फाईल तपासतात आणि त्या नंतरच तो शासन निर्णय निर्गमित होत असतो. त्यामुळे खोटे बोलून जीआर काढला वगैरे असे म्हणणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे आणि आपल्या अर्धवट माहितीचे प्रदर्शन करणे असे आहे. या ताईनी गेल्या पंधरा वर्षात ज्या काही मीडिया ट्रायल रन केल्या, ज्या कोणाविरुद्ध आरोप केले त्यातील एकही आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात अथवा इतरत्र कुठेही सिद्ध होऊ शकलेला नाही," असे ते म्हणाले.
"मंत्रिमंडळाचा निर्णय झाला किंवा नाही असे भासवून निर्णय होत नाही, एखादी नसलेली गोष्ट भासवून सिद्ध करण्यासाठी ती कथित प्रेस कॉन्फरन्स आहे का? एखाद्या विषयास मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेअंती मान्यता झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त हे मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्यानंतर राज्यातील सर्वोच्च आयएएस अधिकारी असलेल्या माननीय मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केले जातात. मात्र, दमानिया यांनी या प्रक्रियेची माहिती घेतली असती तर असे निराधार आणि धादांत खोटे विधान कदापि केले नसते. ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून ते काहीही तथ्य नसलेल्या आभासी घोटाळ्यांचे कोणते तरी अर्धवट कागद समोर दाखवून त्याला पुरावा म्हणणे आणि मिडिया ट्रायल रन करणे एवढाच सपाटा सुरू आहे, त्यासंदर्भात त्यांच्याकडे कॉंक्रीट कागदपत्रे असल्यास त्यांनी न्यायालयात जावे, आता न्यायालयामध्ये आम्ही देखील याविरुद्ध योग्य लढा उभा करून दाद मागू," असे आव्हानही मुंडेंनी दिले.
माझ्या बदनामीसाठी हे धोरण!
"फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर हा केंद्र शासनाचा कायदा आहे, त्यानुसार विशिष्ट प्रमाणपत्र धारण केल्याशिवाय व खत निर्माता कंपनीने प्राधिकृत केल्याशिवाय कोणालाही खतांची विक्री करता येत नाही. यासंदर्भात IFFCO ने संबंधित कंपन्यांना २०२२ व २०२३ मध्ये सुद्धा नोटीस दिलेल्या आहेत. याबाबत मी आधीही स्पष्टपणे बोललो आहे. पण आपल्या सोयीचे तेवढे बोलायचे आणि अर्धवट ज्ञान प्रदर्शन करणे हे धोरण फक्त माझ्या बदनामीसाठी आहे. सदर कंपन्या या आमची उत्पादित खते विकण्यास प्राधिकृत नाहीत, फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर मधील तरतुदींप्रमाणे ओ प्रमाणपत्र असल्याशिवाय अशी खते विकता येत नाहीत, अशा प्रकारची प्रेस रिलीज स्वतः इफकोने याआधीच काढलेली आहे, तसेच ती आजही IFFCO च्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यांना देखील ही बाब समजत असावी, मात्र तरीही खोटे बोल पण रेटून बोल, असा उद्योग त्यांनी चालवला आहे," अशी टीकाही धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्यावर केली आहे.