चीन, चाचा आणि चमचे

    19-Feb-2025   
Total Views | 38

congress
 
काँग्रेस पक्ष, गांधी घराणे आणि त्यांचे चीनप्रेम हे तसे परंपरागतच. गांधी परिवाराला अगदी चाचा नेहरूंपासून लाभलेला हा वारसाच. म्हणूनच एकीकडे नेहरूंच्या नेतृत्वात ‘हिंदी-चिनी भाई भाई’चा नारा भारतात गुंजत असताना, दुसरीकडे कुरापतखोर चीन लडाखमध्ये सैन्य घुसवून आपल्या मातृभूमीचे लचके तोडत होता. एवढेच नाही तर चीनने लडाखचा काही भूभाग गिळंकृत केल्यानंतरही, नेहरूंनी चिनी ड्रॅगनला फारसे गांभीर्याने घेतले नाही. कारण, ‘त्या जमिनीवर साधं गवताचं पातंही उगवत नाही,’ म्हणत चीनने हडपलेल्या लडाखमधील त्या भूभागाचे (अक्साई चीन) लष्करीदृष्ट्या महत्त्वही नेहरूंनी दुर्लक्षिले, याचा इतिहास साक्षीदार आहेच. म्हणजे एकूणच काय तर, नेहरूंच्या काळातही दगाबाज चीन काँग्रेसला कधी शत्रू वाटला नाही आणि आजच्या राहुल गांधी-पित्रोदा जोडगोळीला तर चीनचा पराकोटीचा पुळका.म्हणूनच काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी चीन हा भारताचा शत्रू नसून, भारताकडून मुद्दाम हा मुद्दा भडकाविला जात असल्याचा मूर्खपणाचा दावा नुकताच केला.
 
मग काय, यावरून टीका होताच नेहमीप्रमाणे काँग्रेसने पित्रोदांच्या विधानांशी संबंध नसल्याचे सांगत लगोलग ‘हात’ झटकलेच. पण, पित्रोदा हे काही एकटेच काँग्रेसी चीनसमर्थक नव्हे. खुद्द राहुल गांधी यांनीही वेळोवेळी संसदेत आणि संसदेबाहेरही चीनचीच तळी उचलण्याचे उद्योग केले. म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना, राहुल गांधी यांनी त्यांच्या ४५ मिनिटांच्या भाषणात तब्बल ३४ वेळा चीनचा उल्लेख केल्याचा आरोप भाजपने केला. त्यामुळे देशाचा विरोधी पक्षनेता संसदेत चीनची भाषा बोलतो का, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित व्हावा. एवढेच नाही तर संपुआच्या काळातील गांधी घराण्याची चीनशी जवळीक तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही कायम राहिल्याचे दिसून आले. २०१७ साली नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी चिनी राजदूताची घेतलेली भेट वादाच्या भोवर्‍यात सापडली. पण, त्यावेळीही “माहिती घेणे हे माझे कर्तव्य आहे” असे सांगत राहुल गांधींनी त्या भेटीचे समर्थन केले. तसेच, चीनने भारताच्या किती जमिनीवर कब्जा केला? आपली संरक्षण सिद्धता किती? यांसारखे राष्ट्रसुरक्षेशी संवेदनशील प्रश्नही राहुल गांधींनी संसदेत वारंवार विचारले. मग हे सगळे कोणासाठी? केवळ स्वत:च्या माहितीसाठी की ती माहिती चीनला देऊन मोबदला मिळविण्यासाठी?
 
 
 
खटाखट, खोटे आणि खल्लास
 
 
 
कोलकाता शहरानंतर सर्वांत धीम्या गतीने वाहने हाकता येतील अशी देशाची ‘आयटी कॅपिटल’ असलेल्या बंगळुरुची ओळख. कर्नाटकच्या राजधानीचे शहर असलेल्या या शहराचे वातावरण कितीही आल्हाददायक वगैरे असले, तरी वाहतुककोंडीची समस्या तितकीच त्रासदायक. तर अशा या बंगळुरुला वाहतुककोंडीमुक्त करण्यासाठी मेट्रोचा पर्याय निवडला गेला. २०११ साली ‘नम्मा मेट्रो’ बंगळुरुवासीयांच्या सेवेत दाखल झाली. आज देशात दिल्लीखालोखाल सर्वाधिक लांबीचे कार्यान्वित (७६.९५ किमी) मेट्रो नेटवर्क म्हणून बंगळुरु मेट्रो ओळखली जाते. पण, नुकतेच या मेट्रोच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आणि बंगळुरुवासीयांमध्ये असंतोषाची लाट उफाळून आली. कारण, ही भाडेवाढ साधीसुधी नव्हे, तर भरघोस दराने करण्यात आली. म्हणूनच विविध संघटनांचे प्रतिनिधी रस्त्यावर उतरले व त्यांनी सिद्धरामय्या सरकारचा निषेधही नोंदवला. आता सार्वजनिक प्रवास वाहतुकींच्या पर्यायांमध्ये भाडेवाढ ही अपरिहार्य. पण, ही भाडेवाढ करण्यासंबंधीही काही निकष आहेत, नियम आहेत. परंतु, बंगळुरु मेट्रोची भाडेवाढ करताना सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यामुळे मेट्रोचे कमाल भाडे ६० रुपयांवरून ९० रुपयांवर, तर मेट्रो प्रवासासाठीच्या स्मार्ट कार्डसाठीचा किमान बॅलन्स हादेखील ५० रुपयांवरून ९० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. मेट्रोचे दोन किमीपर्यंतचे भाडे दहा रुपये, तर दोन ते चार किमी टप्प्यातील भाडे हे २० रुपये असले, तरी प्रामुख्याने लांबवरच्या टप्प्यातील भाडेवाढीने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. परिणामी, भाडेवाढीची घोषणा होताच बंगळुरु मेट्रोच्या प्रवासीसंख्येत सहा टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
 
अखेरीस मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी या भाडेवाढीची गंभीर दखल घेऊन, भाडे पूर्वपातळीवर आणण्याचे आदेश दिले खरे. पण, एकूणच काँग्रेसशासित कर्नाटकचा कारभार पाहता, केवळ मेट्रोच नव्हे, तर बस, दूध, पेट्रोल, डिझेल अशा किती तरी उत्पादन-सेवा महागल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी निवडणूक प्रचारात खटाखट...खटाखट खात्यात पैसे येतील, म्हणून सुसाट आश्वासने देत सुटले होते. पण, सत्य हेच की, खोटारड्या राहुल गांधींमुळे खटाखट...खटाखट पैसे कर्नाटकवासीयांच्या खिशातून आता खल्लास होत आहेत.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121