‘एसआयटी’ स्थापन करा, ‘सर्च ऑपरेशन’ राबवा; कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
12-Feb-2025
Total Views | 23
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेल्या ‘जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट’ या मदरशामध्ये येमेनमधील नागरिकाचे बेकायदेशीर वास्तव्य होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध व्हिजा नव्हता. मात्र, त्याचे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्तऐवज बनवून त्याला मदरशामध्ये आश्रय देण्यात आला होता. दि. ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राज्यभरातील मदरशांमध्ये असे प्रकार सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त करून मंत्री नितेश राणे यांनी सर्च ऑपरेशन राबवण्याची मागणी केली.
मदरशांमध्ये विशिष्ट धर्मियांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मागे एका हिंदू शिक्षकाने प्रवेश केला असता, त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. याचा अर्थ तेथे गैरप्रकार सुरू आहेत. शिक्षण संस्थांच्या नावाखाली सरकारकडून अनुदान लाटले जाते आणि मदरश्यांमधून राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जाते. विशिष्ट धर्माच्या नागरिकांना मदरशांमध्ये बेकायदेशीररित्या आश्रय दिला जातो, देशविरोधी कारवायांकरिता आर्थिक मदत पुरविली जाते. त्यामुळे ‘सर्च ऑपरेशन’ राबवून अशा संशयीत संस्थांचा शोध घ्यावा, त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणी विविध स्तरांतून प्राप्त झाली आहे. त्यामुळे ‘एसआयटी’ स्थापन करून संशयीत संस्था आणि संबंधित मदरशांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणीची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, असे नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सरकारी पैशातून देशविरोधी काम
सरकारी पैशातून देशविरोधी ताकदींना पोसण्याचे काम मदरशांमधून होत आहे. त्यामुळे राज्यभरातील मदरशांमध्ये सर्च ऑपरेशन राबवावे, एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आझमगडमध्ये अलिकडे ‘ईओडब्ल्यू’ने ११ मदरशांवर कारवाई करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्थ केले. महाराष्ट्रातही अशाप्रकारची कारवाई करून अतिरेकी घडवणारे मदरसे बंद करावेत, अशी आमची भूमिका आहे.
-नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री
...तर पुन्हा २६/११ होईल
शिक्षण संस्थांच्या नावाखाली मदरसे सरकारी अनुदान मिळवतात. पण, तेथे गैर धर्मियांना प्रवेश दिला जात नाही. कोणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाच, तर प्राणघातक हल्ले केले जातात. याचा अर्थ शिक्षणाच्या नावाखाली तेथे गैरधंदे सुरू आहेत. अक्कलकुवामधील मदरशात देशविरोधी कारवाया सुरू होत्या, हे उघड झाले आहे. मग, या शिक्षणसंस्था आहेत, की अतिरेकी घडवणाऱ्या संस्था, असा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे या मदरशांच्या आत घुसून तेथे कोण राहतात, कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, शिक्षक कोण आहेत, हत्यारे ठेवली आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी. हे अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत. अन्यथा महाराष्ट्रात २६/११ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिला.
शुक्रवारी सुट्टी कोणत्या नियमानुसार?
भारतात सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांना रविवारी सुट्टी असते. मात्र, मदरसे शुक्रवारी म्हणजे झुम्माच्या दिवशी बंद ठेवले जातात. भारतात मदरशांनी स्वतःसाठी वेगळे नियम तयार केले आहेत का? भारताला इस्लामिक राष्ट्र बनवून शरिया कायदा लागू करण्याची मानसिकता यामधून दिसून येते, असा संशय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.