मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Akhil Bharatiya Sant Samagam) "सनातन परंपरा जपण्यात वनवासी समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्ञान, संस्कार, परंपरा जोपासण्यासाठी जनजाती भागातील संतांनी अधिक प्रयत्न करण्याची आज आवश्यकता आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. प्रयागराज येथे महाकुंभात नुकत्याच संपन्न झालेल्या 'अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम' आयोजित 'अखिल भारतीय संत संमेलना'त ते बोलत होते.
हे वाचलंत का? : सौगंध राम की खाते हैं हम 'मंदिर मुक्त' कराएंगे
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, "भारतीय आणि सनातन परंपरा परदेशी विचारधारा लादणे, धर्मांतरण यांसारख्या समस्यांना आज हिंदुत्व तोंड देत आहेत. या संकटांना तोंड देत जनजाती संतांनी दुर्गम वनक्षेत्रात अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हिंदू धर्म जिवंत आहे. येणाऱ्या काळात जनजाती समाजात पर्यावरण, संशोधन, शिक्षण, मूल्ये, धार्मिक प्रबोधन आणि सेवा या माध्यमातून जागृती आणून आपल्या समाजाची एकता व अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. वनवासी कल्याण आश्रम याच दिशेने कार्यरत आहे. जनजाती भागातील सर्व संतांनी कल्याण आश्रमाला पाठिंबा देऊन सनातन संस्कृती मजबूत करण्याचे काम करावे."
अ.भा.वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी संत संमेलनाचे प्रास्ताविक केले. आपल्या जनजाती समाजाला तोडण्याचे विविध प्रयत्न देशातील जनजाती भागात सुरू आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व संत-मुनींनी पुढे येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला देशभरातील विविध प्रांतातील ७७ जनजाती समाजाचे संत-महंत उपस्थित होते. जनजाती भागात काम करताना आलेल्या आव्हाने आणि परिस्थितीबद्दल संतांनी आपले यावेळी अनुभव सांगितले. संत समागमात वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह, गंगाधर जी महाराज आणि दादू दयाल जी उपस्थित होते.