मुंबई : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
संपुर्ण राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या सीआयडीकडून तपास सुरू आहे. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही जण अद्यापही फरार आहेत.
दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ९ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गित्ते यांचा समावेश आहे.