भाजपचे अधिवेशन आणि अमितभाईंचे भाषण शरद पवारांच्या जिव्हारी!
मंत्री आशिष शेलार : शरद पवारांच्या टीकेवर प्रत्युत्तर
14-Jan-2025
Total Views | 174
मुंबई : भाजपचे अधिवेशन आणि अमितभाईंचे भाषण शरद पवारांच्या जिव्हारी लागले आहे, असा पलटवार माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवार, १४ जानेवारी रोजी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "भाजप पक्ष, पक्षनेतृत्व, सरकार आणि अमितभाई शाह यांच्यावरची वक्तव्ये बघता शरद पवार साहेबांचा तोल जाऊ लागल्याचे लक्षात येते. अमितभाईंचे भाषण आणि भाजपचे अधिवेशन त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. तडीपारीची भाषा आणि वक्तव्यांमुळे तुम्हाला, तुमच्या पक्षाला, मित्रपक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केले आहे. त्याचे तुम्ही चिंतन करा. ज्या अमितभाईंना न्यायालयात निर्दोषत्व मिळाले त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रकरणाबद्दल वारंवार उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून नाही. लवासाच्या बाबतीत कोर्टाने केलेले निर्देश, उपस्थित केलेल्या शंका आणि त्याभोवतीचे वलय हे बघता चार बोटं कुणाकडे येतात ते लक्षात ठेवा. महाराष्ट्राने असाही नेता बघितला नव्हता हे म्हणण्याची आमच्यावर वेळ आणू नका."
ते पुढे म्हणाले की, "बोलता बोलता तुम्ही माझ्या मंत्रीमंडळात जनसंघाची लोकं मंत्री म्हणून होती, हे तुम्ही सत्य बोललात. संघ, जनसंघ आणि भाजपशी तुमची जवळीक होती, हेच तर महाराष्ट्रातील काही लोक सांगत होते. त्यामुळे मी कधी त्यांच्यासोबत जाणारच नाही, हे तुम्ही असत्य बोलत होतात, हे आज स्वत:च मान्य केले आहे. कधी कधी सत्य समोर येते. जनसंघाच्या जीवावर तुम्ही सरकार बनवले हे तुम्ही मान्य केले. पण जरा आणखी खरे बोला. ते सरकार बनवण्यापूर्वी विश्वासघाताचे खंजीर खुपसण्याचे कुठले बीजारोपण तुम्ही केले होते? कुठल्या नेत्याच्याविरोधात केले होते? असा सवालही आशिष शेलार यांनी शरद पवारांना केला.
महाराष्ट्रातून हद्दपार झालेल्यांनी तडीपारीची भाषा करू नये!
"महाराष्ट्रात ४५ वर्षापूर्वी विश्वासघातकी संस्कृतीचे जनक कोण होते? हे सत्यही एकदा समोर आणा. त्यामुळे जे स्वतः महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये. शरद पवार साहेब आपण तोल गेल्यासारखे वागून अशी वक्तव्ये करू नयेत. न्यायिक प्रक्रियेत ज्या अमितभाईंना निर्दोषत्व मिळाले त्यांच्या बाबतीत विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेत इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलण्याची वेळ तुम्ही आणू नका. खंजीर खुपसण्याच्या ४५ वर्षांपूर्वी राजकारणासाठी आणि सत्तेसाठी वाट्टेल ते याचे जनक कोण त्याचेही उत्तर द्या. जनसंघ आणि भाजपासोबत तुम्ही सरकार बनवले. सत्तेसाठी तुम्हाला काहीही लागत नाही हेदेखील महाराष्ट्राला सांगा," असेही आशिष शेलार म्हणाले.