चंद्राबाबू नायडूंचा वाय.एस.आर. काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप
व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी?
19-Sep-2024
Total Views | 56
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chandrababu Naidu on YSR Congress) वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाच्या राजवटीत तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू बनवण्यासाठी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशच्या विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधताना हे विधान केले आहे.
चंद्राबाबू नायडू म्हणाले की, वाय.एस.आर.काँग्रेस सरकारने केवळ निकृष्ट दर्जाचे अन्नच नाही दिले तर भगवान व्यंकटेश्वराला अर्पण केला जाणारा प्रसाद बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्यदेखील वापरले आहे. शुद्ध तूप वापरण्याऐवजी त्यांनी प्राण्यांची चरबी वापरली.” वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी मात्र नायडूंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
“चंद्राबाबू नायडू यांनी पवित्र तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला कलंकित करून आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला तडा देऊन घोर पाप केले आहे. तिरुमला प्रसादमबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत वाईट आहे. मानवी सभ्यतेची कोणतीही व्यक्ती अशी विधाने किंवा आरोप करणार नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी हे विधान केले आहे.", असे म्हणत वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंच्या आरोपांचे खंडन केले आहे.