तिसऱ्या आघाडीत एमआयएमला एन्ट्री नाही! बच्चू कडूंनी सांगिलतं कारण
18-Sep-2024
Total Views | 67
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने महायूती आणि महाविकास आघाडीशिवाय आता राज्यात तिसरी आघाडी होण्याचे संकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिले आहेत. मात्र, या आघाडीत एमआयएम पक्षाला सहभाग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी यामागचे कारणही स्पष्ट केले. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
बच्चू कडू म्हणाले की, "तिसऱ्या आघाडीने आम्ही महाशक्ती निर्माण करू. उद्या आमची एक बैठक आहे. या बैठकीत राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकरांचे चुलत भाऊ राजदत्त आंबेडकर आणि इतर काही संघटन असतील. ही एक वैचारिक बैठक असून यात आमचे सर्व मुद्दे स्पष्ट होतील. हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूकीला जाऊ. एमआयएमची प्रखरता पचवणं आम्हाला सहज शक्य होणार नाही. लोकांनाही ते शक्य होणार नाही. त्यामुळे धार्मिक कटूता निर्माण करणाऱ्या कोणत्याही पक्षापासून दूर राहण्याचा आम्ही प्रयत्न करू," असे ते म्हणाले.