सीमेवरील राज्यात टाटा सन्सची २७ हजार कोटींची गुंतवणूक!
05-Aug-2024
Total Views |
मुंबई : टाटा इलेक्ट्रॉनिकसने देशात चिप उत्पादनात मोठी गुंतवणूक केली आहे. आसाम राज्यात टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट या अंतर्गत आसाममधील जागीरोड येथे प्लांट उभारणार असून याचे भूमीपूजन सोहळ्याकरिता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आसाममधील जागीरोड येथे टाटा ग्रुपच्या माध्यमातून उभारणाऱ्या प्रकल्पाच्या निर्माणानंतर चिप उत्पादनास सुरूवात होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून आसाममध्ये २७ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी स्थानिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे टाटा ग्रुप सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरल्यानंतर हा प्रकल्प केवळ आसाममध्ये औद्योगिक क्रांतीच आणणार नाही तर चिप उत्पादनात आत्मनिर्भरतेचा दिशादर्शक ठरेल.
या प्रकल्पाच्या युनिटमध्ये तीन प्रमुख चिप तंत्रज्ञान विकसित केले जातील. या माध्यमातून वायर बाँड, फ्लिप चिप आणि I-SIP (पॅकेजमध्ये एकात्मिक प्रणाली) या तीनही प्रमुख तंत्रज्ञान या प्लांटमध्ये समाविष्ट केले जातील. महत्त्वाचे म्हणजे यातून देशात चिप उत्पादन विकसित केले जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी आसामच्या नागरिकांना उद्योगपती रतन टाटा यांच्याकडून शुभेच्छा दिल्या. तसेच, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांनी प्रकल्पाला गती देण्यासाठी मदत केल्याबद्दल आभार मानले. यामुळे २७ हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स व्हॅल्यू चेन तयार करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे चंद्रशेखरन यांनी यावेळी सांगितले.
देशातील प्रगत इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टमचे नेतृत्व करण्याचा टाटा समूहाला अभिमान आहे. नावीन्यपूर्ण उद्योग आसामला ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स ग्लोबल सप्लाय चेन इकोसिस्टममध्ये चालना देईल. टाटा समूहाचे आसामशी मजबूत संबंध असून समूहाचे ६० हजार कर्मचारी येथे विविध उद्योगांमध्ये काम करत आहेत, असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले.