मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Borivali Hindu) हिंदू नववर्ष स्वागत समिती, बोरीवलीच्या वतीने रविवार, दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळी ६ वाजता, बोरीवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दीड हजारांहून अधिक हिंदू या ठिकाणी जमले; ज्यामध्ये ११०० हून अधिक पुरुष आणि ४०० च्या आसपास महिलांचा समावेश होता.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, विश्व संवाद केंद्रचे कोकण प्रांत संपादक पराग नेरूरकर, भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खंणकर यांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. बांगलादेशातील परिस्थीती आपल्या देशात उद्भवू नये म्हणून सकल हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर या एकत्रीकरणाचे रूपांतर भव्य मोर्चात झाले.
बोरिवली स्टेशन पासून सुरू झालेला ह्या मोर्चाची सांगता वंदे मातरम् गीताने स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, बोरिवली पश्चिम येथे झाली. बोरिवली विधानसभा आमदार सुनील राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुंबई महानगर सहकार्यवाह विलास भागवत, यांनीही मोर्चात सहभाग घेतला होता.