मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये यंदा चांगल्या पावसामुळे ९३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तरीही काही निवडक ठिकाणांहून पाणी पुरवठयाबाबतच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळेच लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा. तसेच बेकायदेशीर मोटार पंप, अनधिकृत नळजोडण्या यांना आळा बसावा म्हणून पथके गठीत करावेत. अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करावेत, तसेच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, भांडूप संकूल व पिसे पांजरापूर संकूल जलप्रक्रिया केंद्रातील पाण्याची पातळी योग्य राखण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, संभाव्य गळती, पाण्याचा उपसा वाढणे आणि बेकायदेशीर मोटर पंपांचा वापर यासोबतच दूषित पाणीपुरवठ्याचा स्रोत शोधला पाहिजे.पाण्याचा उपसा जेवढा सुनिश्चित केला आहे, तेवढाचा केला पाहिजे. पाण्याचा अतिरिक्त उपसा होणार नाही, याची दक्षता बाळगली पाहिजे. त्याचबरोबर 'व्हॉल्व्ह ऑपरेशन' वर संपूर्ण नियंत्रण ठेवून पाणीवाटप कोट्यानुसार संपूर्ण कार्यक्षेत्राला पाणीपुरवठा होतो की नाही यावरदेखील देखरेख ठेवली पाहिजे, असे जल अभियंता विभागाने करावयाच्या अपेक्षित कार्यवाही बाबत आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, जल अभियंता श्री. पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
योग्यरित्या पाणीपुरवठा न झाल्यास करा तक्रार
नागरिकांच्या घरात, परिसरात नळांना येणारे पाणी पुरेशा दाबाने, स्वच्छ येते का याची खातरजमा करत, या आधारे पाणीपुरवठा योग्य होत आहे की नाही, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी पाणीपुरवठाविषयक तक्रारींसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.