युरोप, आखाती देश आणि अनेक प्रगत देशांना कामगारांची मोठी कमतरता जाणवते. त्यामुळे या देशांमध्ये भारतातील कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, या देशांमध्ये बरेचदा कामगारांचे शोषण होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे प्रकार थांबवण्याकरिता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, यामध्ये सरकारी यंत्रणांनी पूर्णपणे लक्ष घालून, परदेशातील भारतीय कामगारांचे शोषण हे थांबवलेच पाहिजे.
परदेशात भारतीय कामगारांना रोजगार देणार्या देशांना सर्वप्रथम ही समज हवी की, भारत एक महाशक्ती आहे आणि भारतीय नागरिकांचे ते शोषण करू शकत नाहीत. स्वस्तात मिळणारा कामगार या देशांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग आहे. भारतीय कामगारांची भारत आणि परदेशातील एजंट्सकडून संस्थात्मक तस्करी हादेखील तितकाच गंभीर मुद्दा आहे.
अनेक एजंट्स आणि बेकायदेशीर कंपन्यांच्या कर्मचार्यांना अटक करून त्यांना शिक्षा करण्यामध्ये भारत सरकारला यश मिळालेले आहे. मात्र, देशात गल्लोगल्ली काम करणार्या या संस्था आणि एजंट्स यांची पूर्ण चौकशी करून भारतीय कामगारांची देशाबाहेर बेकायदेशीर पद्धतीने होणारी तस्करी ही थांबलीच पाहिजे.
परदेशात जास्त कमाईची संधी!
भारतात पुरेसा रोजगार नाही, परदेशात जास्त पैसे मिळतात अशी समजूत. यामुळे कामगारवर्ग परदेशात जातो. अलीकडेच परदेशात घडलेल्या अपघाताच्या, युद्धाच्या घटनांमुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक भारतीय धोकादायक मार्गाने, धोकादायक देशांमध्ये जातात आणि अनेकवेळा धोकादायक व्यवसाय करतात. ज्यावेळेला फसवणूक होते, त्यावेळेला एकदम त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना भारत सरकारची आठवण येते आणि नंतर अर्थातच सरकार पूर्ण प्रयत्न करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. अनेकवेळा चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे त्यांच्यावरती त्या देशांकडून कायदेशीर कारवाई केली जाते. त्या देशातील कायद्याप्रमाणे अनेकांना कैदेत टाकले जाते, ज्यामुळे त्यांना भारतात परत आणणे सोपे नसते.
भारतीय कामगारांचा अनेक देशात मृत्यू
दि. १२ जून रोजी कुवेतमधील मंगाफ शहरात एका इमारतीला लागलेल्या आगीत ४५ मजुरांचा मृत्यू झाला. यांपैकी बहुतांश तामिळनाडू आणि केरळचे नागरिक होते. या इमारतीत हे कामगार कोंबलेले होते. आगीच्या ज्वाळा, धुराने श्वास कोंडलेल्या अवस्थेत जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्यासही त्यांना वाव नव्हता. कारण, गच्चीच्या दाराला टाळे होते.
भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर कुवेतमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना पुरेसा मोबदला दिला जात आहे आणि गुन्हेगारी कंपनीवर आणि मालकांवर कारवाई केली जात आहे.
इटलीतील लॅटिना येथे सतनाम सिंग हा शेतात मजुरी करत असताना, यंत्रामुळे अपघात घडून जखमी झाला. तो तशाच अवस्थेत रस्त्याकडेला पडून मृत्यू पावला.
भारत सरकारच्या तक्रारीनंतर इटली सरकारने कायदेशीर कारवाई सुरू केली.
रशिया-युक्रेन युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू झाला. रशियाने अशा शेकडो भारतीयांना शांततेच्या काळात नोकरीचे आमिष दाखवले आणि नंतर त्यांना बळजबरीने सैन्य प्रशिक्षण देऊन युद्धात पाठवले गेले. भारत सरकारने जाहीरपणे रशियाच्या राजदूतांना अशी भाडोत्री सैन्यभरती थांबवण्याचा इशारा दिला होता. रशियन सैन्यात यापुढे एकाही भारतीयाची भरती व्हायला नको, अशी मागणी भारताने केली. रशिया अशा तरुणांना परत पाठवत आहे. मात्र, भारतीय, परदेशी एजंट्स तिसर्या देशातून युक्रेन युद्धासाठी भरती केले जात आहेत.
इस्रायलने बांधकाम आणि इतर नोकर्यांमध्ये काम करणार्या पॅलेस्टिनींना ‘वर्क परमिट’ देणे बंद केले. मजुरांच्या तीव्र टंचाईला तोंड देत असलेल्या इस्रायलने मग भारतासह इतर बाजारपेठांकडे मोर्चा वळवला. लेबनॉन सीमेजवळील ‘हिजबुल्ला’च्या हल्ल्यात एका केरळच्या कामगाराचा मृत्यू झाला. तरीही अनेक भारतीय जास्त पगारामुळे तिथे जायला तयार आहेत.
क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या वापरामुळे केवळ सीमाभागच युद्धभूमी नाही, तर पूर्ण इस्रायल किंवा आसपासचे आखाती देश हे युद्धभूमी बनलेले आहेत. जरी तुम्ही कामगार म्हणून गेला असलात, तरी आकाशातून झालेल्या फायरिंगमुळे मृत्यू होऊ शकतो.
कतार, कुवेत आखाती देशांच्या विरुद्ध कारवाई करा
कतारला ‘फिफा विश्वचषक २०२२’चे यजमानपद बहाल केल्यानंतर १३ वर्षांच्या कालावधीत फुटबॉल स्टेडियम बांधणार्या हजारो आफ्रिकन आणि आशियाई कामगारांचे मृत्यू ही कदाचित जगासाठी सर्वात लाजिरवाणी बाब आहे. २०१४ ते २०२१ या कालावधीत सुमारे २ हजार, ४०० भारतीयांचाही मृत्यू झाल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले. या कामगारांचा उष्णतेमुळे, निर्जलीकरणामुळे आणि दुर्लक्षामुळे मृत्यू झाला.
काही भारतीय तरुणांना थायलंडमध्ये ६५ हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पाठवण्यात आले होते. पण, तेथून बेकायदेशीररित्या लाओस देशात नेऊन त्यांना सायबर फसणूक करणार्या कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडण्यात आले. कॉल सेंटरमध्ये ३० भारतीय तरुण होते. तेथील कॉल सेंटरद्वारे अमेरिका, युरोप व कॅनडातील नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात येत होती.
बहुतेकवेळा त्यांचे मोबाईल काढून घेतले जातात. पासपोर्ट गायब होतात. ज्यामुळे ते त्या देशांमध्ये बेकायदेशीररित्या आले आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून अजून बेकायदेशीर काम करवले जाते.
तेथे अडकलेल्या तरुणांनी याप्रकरणी स्थानिक भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर या तरुणांची सुटका करण्यात आली.
वेश्याव्यवसाय व मानवी तस्करी
परदेशात नोकरीसाठी जाणार्या तीन महिलांना सहार पोलिसांनी अटक केली होती. दलालाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडे दिली होती. पण, विमानतळावर या महिलांना अडवून अटक करण्यात आली. एका प्रकरणात मुंबईतील २४ वर्षीय तरुणीला हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बहारिनला पाठवण्यात आले होते. तेथे दोन-तीन महिने तिला काम दिल्यानंतर तिचा मोबाईल व पासपोर्ट काढून घेऊन तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. त्यानंतर तिला परदेशात पाठवणार्या टोळीने तिच्या सुटकेसाठी दोन लाख रुपये मागितले. पैसे देऊन कुटुंबीयांनी मुलीची सुटका केल्यानंतर या टोळीने नेपाळ व भारतातून ६०० मुलींना अशाप्रकारे बहारिनला वेश्या व्यवसायासाठी पाठवल्याचे उघड झाले होते. मानवी तस्करी करणारी टोळी महिला-मुलींना परदेशात नेऊन त्यांना वेश्या व्यवसायास भाग पाडत असल्याचे अथवा भीक मागायला लावत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. किडनीसारखे मानवी अवयवही विकायला लावण्यार्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यांना शोधून तुरुंगात डांबले पाहिजे.
अजून काय करावे?
परदेशात नोकरी करायला जाताना सर्वप्रकारे पडताळणी करणे आवश्यक आहे. केवळ दलालांवर विश्वास ठेवून परदेशातील नोकरीचा प्रस्ताव स्वीकारणे त्रासदायक ठरू शकते, फसवणूक होऊ शकते. अनोळखी व्यक्तीमार्फत परदेशात नोकरीला जाणे, धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दलालांमार्फत परदेशात नोकरीसाठी जाताना आपणही पडताळणी करणे आवश्यक आहे. कंपनीची माहिती, तेथे काम करणारे कर्मचारी, संबंधित देशात काम करणारी परिचित व्यक्ती यांच्याकडून पडताळणी करावी. परदेशात फसवणूक झाल्यास तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधावा. परदेशात गेल्यानंतर पासपोर्ट व इतर महत्त्वाची कागदपत्रे अनोळखी व्यक्तीला देणे टाळावे. भारतातही अनोळखी व्यक्तीकडे कागदपत्रांच्या मूळ प्रती देऊ नये. त्या द्यायच्या झाल्यास पूर्ण पडताळणी करावी.
अर्थात, नोकरीच्या नावाने फसवणूक केवळ भारतीयांचीच होते, असे नाही. अशीच फसवणूक बांगलादेशी, नेपाळी, पाकिस्तानी इ. आशिया आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांतील नागरिकांची होत आहे. त्यांच्या सरकारने कितीही तक्रारी केल्या, तरी आखाती देश, रशिया, युरोपमधील देश फारशी कारवाई करत नाही.
त्यामानाने भारताची सामरिक ताकद जास्त असल्यामुळे भारताने केलेल्या तक्रारीवर लगेच दखल घेतली जाते आणि ज्यांनी बेकायदेशीर कृत्ये केली आहेत, त्यांच्यावरती कारवाई केली जाते. हे सरकारी पातळीवर होत आहे. परंतु, तरीही भारतातील आणि परदेशातील अनेक बेकायदेशीर कंपन्या, एजंट्स अनेक भारतीय मजुरांवरती अन्याय करत आहेत. त्यांना शोधून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ज्यामुळे परदेशात काम करणारे भारतीय सुरक्षित राहतील आणि त्यांचे मानवी हक्क भंग होणार नाहीत.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन