मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफूटीसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. या अधिवेशनात पेपरफूटीविरोधात कायदा आणणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
देशभरात अनेक ठिकाणी पेपरफूटीच्या घटना घडल्यानंतर विरोधकांनी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पेपफूटीविरोधात कायदा आणणार का? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "सार्वजनिक बांधकाम, तलाठी भरती, जलसंपदा विभाग, मुंबई उच्च न्यायालय या सगळ्या ठिकाणी पेपर फुटले आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. पण या अधिवेशनात महाराष्ट्रात पेपरफूटीच्या विरोधात कायदा आणणार का? ," असा सवाल त्यांनी केला.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पेपरफुटीचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. जर एक लाख लोकांना नियुक्ती मिळत असेल तर असं म्हणणं योग्य नाही. केंद्र सरकारने पेपरफुटीसंदर्भात कायदा केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील तसा कायदा करण्याचं मागच्या अधिवेशनात घोषित केलं आहे. पेपरफुटीसंदर्भात कायदा आणायचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले असून याच अधिवेशनात हा कायदा आणणार आहे," अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे.