आपली लढाई ३ नव्हे, तर ४ पक्षांशी! फडणवीसांनी सांगितलं 'त्या' चौथ्या पक्षाचं नाव
08-Jun-2024
Total Views | 484
मुंबई : आपली लढाई तीन नाही तर चार पक्षांशी होती. तो चौथा पक्ष म्हणजे खोटा नरेटिव्ह हा होता. पण हा नरेटिव्ह फक्त एखाद्या निवडणूकीत चालतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शनिवारी दादर येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित विधिमंडळ बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "खरंतर आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो. तर एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह. आपल्याला वाटलं की, या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल. पण यांच्याकरिता काम करणाऱ्या चौथ्या पक्षाला आपल्याला रोखावं लागेल हे आपल्या लक्षात आलं नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही."
"यावेळी संविधान बदलणार असा प्रचार करण्यात आला. हा विषय खूप खोलवर गेला. त्यामानाने आपण त्याचा योग्य प्रकारे प्रतिकार करु शकलो नाही. ज्यावेळी त्याचा परिणाम आपल्या लक्षात आला तेव्हा चौथा टप्पा आला होता. त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात आपल्याला २४ पैकी केवळ ४ जागा मिळाल्या. पुढच्या टप्प्यात आपल्या जास्त जागा आल्या. संविधान बदलण्याचा हा नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात तयार झाला. परंतू, हा नरेटिव्ह फक्त एखाद्या निवडणूकीत चालतो. पुढच्या निवडणूकीत तो चालत नाही," असेही ते म्हणाले.