नवी दिल्ली : बिहारची रहिवाशी असलेल्या ईशाने पती आणि मुलाला सोडून सायबर फसवणुकीला सुरूवात केली आहे. ईशाने मुस्ताकच्या सोबतीने तब्बल ५ कोटी रुपये पाकिस्तानला पाठविल्याची माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, ईशा जयस्वाल ही मोतिहारी येथील रहिवासी असून तिने बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे. २०२० मध्ये तिचे लग्न झाले, पण पतीला सोडून ती मुलाला घेऊन आई-वडिलांच्या घरी आली. येथून ती दिल्लीला गेली आणि नंतर पाटण्याला आपले घर बनवले. तेथूनच तिने मुश्ताक आलमसोबत फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता पोलिसांनी तिला अटक केली आहे.
दरम्यान, ईशाचे लग्न नेपाळमध्ये झाले होते. तिला दीड वर्षाचे एक मूल आहे, ज्याला माहेरच्या घरी सोडले असून पाटणा येथे सहावी नापास सायबर फ्रॉड मुश्ताक आलम सोबत फसवणूक सुरू केली आणि त्याच्यासोबत राहू लागली. आता बिहार पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. ईशा इंस्टाग्रामवरही रील्स बनवायची आणि रिल्सच्या माध्यमातूनच ती मुश्ताक आलमच्या संपर्कात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
पैसे पाकिस्तानला पाठवायचे
ईशा आणि मुश्ताककडून पाच कोटी रुपये पाकिस्तानला पाठवण्याचा मनी ट्रेल सापडला आहे. हे दोघेही फसवणुकीच्या रकमेपैकी १० टक्के कमिशन म्हणून ठेवायचे आणि उरलेले पैसे पाकिस्तानला पाठवायचे. या दोघांकडून पाकिस्तानात जाणारी ५ कोटी रुपयांची मनी ट्रेल पोलिसांना सापडली असून आता त्यांच्या कुंडलीचा तपास करत आहेत. ते जामतारा ते भोपाळ आणि मुंबईपर्यंत सायबर फसवणुकीसाठी एकत्र काम करायचे, अशी माहिती समोर आली आहे.
कटिहार पोलिस सायबर सेलचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) सद्दाम हुसैन यांनी सांगितले की, आम्ही सायबर फसवणूक करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत. सायबर पोलिस ठाणे प्रमुखांनी सांगितले की, चौकशीदरम्यान दोघांनीही शेजारी देशाशी थेट संबंध असल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “पाकिस्तानातील मुलतान येथून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे या फसव्या कारवाया करत असत. त्याने डझनभराहून अधिक पाकिस्तानी बँक पासबुकची माहितीही दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १६ एटीएम कार्ड, ६ मोबाईल आणि ६ सिम जप्त केले आहेत.