मुंबई : "विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे", अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ मे रोजी दिली.
दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या मुंबई भाजपा पदाधिकारी बैठकीबाबत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. शेलार म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांची पक्षाने केलेली नोंदणी मोठी आहे. नोंदणी सबमिट केली आहे, त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय सुकाणू समितीमध्ये मित्र पक्षांशी बोलून घेऊ. मुंबईच्या जागेबाबत आता उबाठा सेनेचा काही प्रश्नच नाही. २४ वर्षे जनसंघ आणि भाजपकडे ही होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आदित्य ठाकरे लंडनमधून पॉपकॉर्न खात बोलताहेत का?
कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरे यांनी युती सरकारवर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देत आशिष शेलार यांनी "आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?" असा सवाल केला. आदित्य यांनी उंटावरून शेळ्या हाकू नयेत. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी कोस्टल रोडची कामे महापालिकेकडे घेतली. आदित्यच्या हट्टामुळे त्यांनी तसे केले. मी त्यावेळी प्रश्न मांडले, विधानसभेत बोललो. या कामात महापालिकेने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले होते का? त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आपल्याच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उप कंत्राटदार म्हणून कामे देण्यात आली होती. ती दुय्यम दर्जाची झाली. कामांना विलंब झाला. भ्रष्टाचार झाला. महापालिकेने कारवाई का केली नाही? त्यांच्यावर दबाव होता का? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.