ठाणे : गुढीपाडव्याच्या निमित्त दरवर्षी संस्कार भारती ठाणे शाखेतर्फे गावदेवी मैदानात भव्य रांगोळी रेखाटली जाते. यंदा श्रीराम मंदिर हा रांगोळीचा विषय आहे. श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलनाची कलात्मक मांडणी रांगोळीतून केलेली आहे.
या भव्य रांगोळीचे उदघाटन येथील गावदेवी मैदानात आमदार संजय केळकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, पु. ल. देशपांडे कला अकदामीचे सदस्य, पत्रकार मकरंद मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्कार भारती कोकण प्रांत संघटन मंत्री उदय शेवडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, नववर्ष स्वागत यात्रा पदाधिकारी उत्तम जोशी, संजीव ब्रम्हे, संस्कार भारतीच्या अध्यक्षा प्रा. किर्ती आगाशे यांच्यासह गौरी सोनक, सुधा कर्वे, भरत अनिखिंडी उपस्थित होते.
रांगोळीसह प्रदीप गुप्ते यांच्या कागदांच्या सुबक, रेखीव शिल्पकृतींचे प्रदर्शन प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यानिमित्त संस्कार भारतीच्या नाट्य विभागाचे कार्यकर्ते "शंभर टक्के मतदान, सकारात्मक मतदान" यावर पथनाट्य सादर करून मतदार जागृती करत आहे. हे प्रदर्शन दिनांक सात एप्रिल ते अकरा अकरा पर्यंत सुरू रहाणार आहे. ठाणेकरांनी या भव्य रांगोळीला आवर्जून भेट देऊन रांगोळीचे सौंदर्य अनुभवावे असे आवाहन संस्कार भारतीने केले आहे.