लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या ATS पथकाने दि. ३ एप्रिल रोजी नेपाळ सीमेवरून हिजबुल मुजाहिद्दीनच्या ३ दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील मोहम्मद अल्ताफ आणि सय्यद गझनफर हे पाकिस्तानचे आहेत तर तिसरा दहशतवादी नासिर अली काश्मीरचा आहे. चौकशीदरम्यान त्याने काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याचा मनसूबा स्पष्टपणे सांगितला. काश्मिरी दहशतवादी नसीरने स्वत:ला कारगिल युद्धानंतर दहशतवादी झाल्याचे सांगितले. त्यांच्याकडून अनेक भारतीय बँकांनी जारी केलेली डेबिट आणि क्रेडिट कार्डेही जप्त करण्यात आली आहेत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या तीन दहशतवाद्यांचे टार्गेट रामनवमीचा दिवस होता. त्यांना उत्तर प्रदेशात रामनवमी उत्सव साजरा करणाऱ्या हिंदूंवर हल्ला करायचा होता. सध्या त्यांच्या अटकेनंतर नेपाळ सीमेवर सुरक्षा दलांची सतर्कता वाढवण्यात आली आहे.एटीएस युनिट गोरखपूरचे निरीक्षक विजय प्रताप सिंह यांनी या कारवाईसाठी एफआयआर दाखल केली आहे. त्याने सांगितले की महाराजगंज जिल्ह्यातील नेपाळ सीमेवरील शेख फरेंडा गावात काही दहशतवादी घुसल्याच्या माहितीवर ते आणि त्याची टीम नजर ठेवून होती. ही माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले असून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली. तिघांपैकी मोहम्मद अल्ताफ हा पाकिस्तानातील रावळपिंडी येथील रहिवासी असल्याचे तपासाअंती कळले. दुसरा संशयित सय्यद गझनफर हा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील मुर्तझा मशिदीजवळ राहतो. तिसरा नासिर अली हा श्रीनगरचा रहिवासी आहे.
दरम्यान मोहम्मद अल्ताफकडे एअरटेल सिम, पाकिस्तानी ओळखपत्र, भारतीय आधार कार्ड (बनावट) आणि २०२९ पर्यंत वैध असलेला पाकिस्तानी पासपोर्ट ,4G मोबाईल सापडला. दुसरा दहशतवादी सय्यद गझनफर याच्याकडून २०२९ पर्यंत वैध पाकिस्तानी पासपोर्ट, भारतीय आधार कार्ड (बनावट), पाकिस्तानी ड्रायव्हिंग लायसन्स आणि पाकिस्तानी ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. एटीएसने त्यांच्याकडे भारतीय आधार कार्डाची माहिती विचारली असता दोन्ही दहशतवाद्यांनी माहिती देणं टाळले.तिसरा दहशतवादी नासिर अली याचीही एटीएसने चौकशी केली. नासिर अलीने सांगितले की, कारगिल युद्धानंतर तो दहशतवादी बनण्यासाठी हिजबुल मुजाहिद्दीनच्या सक्रिय सदस्यासोबत पाकिस्तानात गेला होता. येथे त्यांचे प्रशिक्षण मुझफ्फराबाद कॅम्पमध्ये झाले. या कॅम्पमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते. नसीरने पुढे एटीएसला सांगितले की, "मी हिजबुल मुजाहिद्दीनची विचारधारा देखील वाचली आणि हिजबुल आणि इतर जिहादी संघटनांच्या नेत्यांची भाषणे ऐकून आणि व्हिडिओ पाहून प्रभावित झालो."
नासिर अली पुढे म्हणाले, “काश्मीर स्वतंत्र व्हावे आणि पाकिस्तानात त्यांचे विलीनीकरण व्हावे अशी माझी नेहमीच इच्छा होती. "मला हिजबुल मुजाहिद्दीनच्या माझ्या वरिष्ठ मुजाहिद अमीरांकडून सूचना मिळाल्या होत्या की तुम्ही गुप्तपणे जम्मू आणि काश्मीर, भारतात पोहोचा, जिथे तुम्हाला पुढील जिहादी कारवायांची माहिती दिली जाईल."रामनवमीच्या दिवशी दहशत निर्माण करण्यासाठी आलेल्या या सर्वांना अखेर शेख फरेंडा या सीमावर्ती गावातून पकडण्यात आले. नासिर अलीच्या झडतीदरम्यान जिओ आणि एनसेल (नेपाळची सेवा प्रदाता) सिम असलेला मोबाईल फोन, भारतीय पासपोर्ट, भारतीय चलन आणि डॉलर, नेपाळी आणि बांगलादेशी चलनही जप्त करण्यात आले.
नसीरकडे सापडलेल्या एटीएम पाकिटातून ७ बँकांचे कार्ड जप्त करण्यात आले. यामध्ये HDFC, ICICI आणि J&K बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा समावेश आहे. या सर्व कार्डांवर नासिर अलीचे नाव लिहिले आहे. नासिरने असेही सांगितले की त्याला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाकिस्तानी मास्टरमाईंकडून सूचना मिळत होत्या.पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कडक चौकशीदरम्यान गझनफर आणि अल्ताफ यांनी सांगितले की, ते आयएसआयच्या सांगण्यावरून भारतात दहशतवादी हल्ले करून अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. एटीएसने या तिघांवर आयपीसीच्या कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०-बी आणि १२१-अ याशिवाय परदेशी कायदा कलम १४ आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलम ३८, १८, १३ अंतर्गत कारवाई केली आहे.