"इंडी आघाडीचा फॉर्म्युला! पाच वर्षांत पाच पंतप्रधान!"
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूरच्या सभेतून निशाणा
29-Apr-2024
Total Views | 91
सोलापूर : पाच वर्षांत पाच पंतप्रधान हा इंडी आघाडीचा नवा फॉर्म्युला आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केला आहे. सोमवारी सोलापूर येथे पंतप्रधान मोदींची भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी इंडी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या कलंकित इतिहासानंतरही काँग्रेस पुन्हा एकदा देशात सत्ता मिळवण्याचे स्वप्न बघत आहे. परंतू, पहिल्या दोन टप्प्यातील निवडणूकीमध्येच इंडी आघाडीचा डब्बा गुल झाला आणि याचा त्यांना अंदाजही नाही. एकीकडे तुम्ही दहा वर्षांत मोदींना ओळखलं आहे. तर दुसरीकडे, इंडी आघाडीमध्ये नेत्याच्या नावाने महायुद्ध सुरु आहे. ज्या आघाडीचा चेहराच माहिती नाही त्यांच्या हातात एवढा मोठा देश देता येईल का? सत्तेसाठी हे लोकं देशाची वाटणी करत आहेत. त्यांनी आता एक नवीन फॉर्म्युला आणला आहे. पाच वर्षांत पाच पंतप्रधान असा त्यांचा फॉर्म्युला आहे. प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान राहणार. त्याला जेवढी संपत्ती लुटायची आहे तेवढी तो लुटणार. त्यानंतर पुढची ५ वर्षे असंच सुरु राहणार.”
“नकली शिवसेनेचे लोक म्हणतात की, त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक लोकं आहेत. त्यांचा एक नेता तर म्हणतो की, आम्ही एका वर्षात चार पंतप्रधान बनवले तर काय होणार? परंतू, पाच वर्षात पाच पंतप्रधान या फॉर्म्युल्याने एवढा मोठा देश चालू शकतो का? सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडे केवळ हा एकच रस्ता शिल्लक आहे. त्यांना देश चालवायचा नाही, त्यांना तुमच्या भविष्याचीही चिंता नाही. त्यांना फक्त मलाई खायची आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाची भूमी आहे. या भूमीने ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने अनेक महापुरुष दिलेत. त्यांनी समाजातील सर्वात कमजोर वर्गाला प्रेरणा दिली. तुम्ही काँग्रेसची ६० वर्षे आणि मोदींची १० वर्ष बघितली आहेत. मागील १० वर्षांत सामाजिक न्यायासाठी जेवढी कामं झालीत तेवढी स्वातंत्र्यानंतर कधीही झाली नव्हती. काँग्रेसने एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाला प्रत्येक हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे,” असेही ते म्हणाले.