"काही पक्षांनी प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वालाच...; राज ठाकरेंचा टोला
17-Apr-2024
Total Views |
मुंबई : स्वतंत्र भारतात प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम काही पक्षांकडून घडलं, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. बुधवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी सर्व भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काही पक्षांवर नाव न घेता निशाणाही साधला.
राज ठाकरे म्हणाले की, "भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली."
श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय… pic.twitter.com/1sMu2KyZth
"या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो. धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. याचं कारण श्रीराम असोत, भगवान श्रीकृष्ण की, शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती," असे ते म्हणाले. तसेच आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी आहे असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सर्व हिंदू बंधू-भगिनींना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.