जळगाव : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यात शरद पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी शहराध्यक्ष बबलू चौधरी, अमोल तांबोळी, भानुदास वारके, आरिफ मिस्त्री, उबाठा गटाचे बाळा कलवंत, दिलीप चौधरी, अनिल भोई, विलास भोई, नरेश सोनावणे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पक्षप्रवेशावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. मी देखील आज मुख्यमंत्री असलो तरीही तुमच्यातलाच एक आहे. त्यामुळे पक्षाला सर्वसामान्य माणसाशी जोडून पक्षाच्या वाढीसाठी काम करावे," असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केले.