‘परिणीता’ चित्रपटापासून सुरु झालेला विद्या बालनचा अभिनय प्रवास आजही अविरत सुरु आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्युटी विथ ब्रेन असणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). आपल्या अभिनयाचा जोरावर अढळ स्थान निर्माण करणारी विद्या आपल्या परखड मतांनी चाहत्यांची मने जिंकत असते. नुकतंच तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर विधान केले आहे. ही इंडस्ट्री कुणाच्या बापाची नाही असे तिने (Vidya Balan) म्हटले आहे.
विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांचा आगामी दो और दो प्यार हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनी इंडियन एक्स्प्रेस ‘एक्सप्रेसो’ मालिकेच्या पहिल्या भागात हजेरी लावली होती. यावेळी विद्या बालन म्हणाली की, “नेपोटिझम असो किंवा नसो, मी इथे आहे. इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, तसं असतं तर आज प्रत्येक बापाचा मुलगा आणि प्रत्येक बापाची मुलगी यशस्वी असते (सर्व स्टार किड्स यशस्वी झाले असते),” असे स्पष्ट उत्तर विद्या बालनने दिले.
पुढे विद्या बालन म्हणाली की, ““मी तीन वर्षे हार्टब्रेकमधून जात होते. सारखे नकार मिळत होते आणि त्यामुळे मला त्रास होता. मी अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते आणि या क्षेत्रात पुढे जाण्याची माझी इच्छा होत नव्हती. पण माझ्या मनात काहीतरी करायची आग होती जी या सर्व नकारांपेक्षा मोठी होती,” असंही विद्या म्हणाली.
विद्या आणि प्रतीक यांची प्रमुख भूमिका असणारा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट लग्न, वैवाहिक जोडप्याचे जीवन यावर भाष्य करणारा आहे. १९ एप्रिल रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. तसेच, आगामी 'भुल भुलैय्या ३' मध्ये पण पुन्हा एकदा विद्या बालनची एन्ट्री झाल्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.