विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी चित्रपट २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता.
मुंबई : ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटाने प्रेक्षकांची मने तर जिंकली होतीच पण बॉक्स ऑफिसवर देखील भरघोस कमाई केली होती. ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत संवेदनशील विषय़ावर भाष्य करणाऱ्या या (The Kerala Story) चित्रपटाने नवा इतिहास रचला होता. या चित्रपटाबद्दल विशेष आठवण निर्माते विपुल शाह यांनी सांगितली आहे. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती या सत्य घटनेवर चित्रपटाचे कथानक आधारित होते. आता पुन्हा एकदा विपुल शाह आणि सुदिप्तो सेन ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) हा चित्रपट घेऊन येत आहेत.
हे वाचलंत का? - प्रेम नव्हे, तर एक रचलेले षड्यंत्रच; ‘द केरला स्टोरी’निमित्त चर्चासत्रातील सूर
‘बस्तर’ चित्रपटाच्या निमित्ताने संपुर्ण टीमने ‘अजित भारती’ या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान विपुल शाह यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, “या चित्रपटाला एवढं यश मिळेल, प्रसिद्धी मिळेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. जेव्हा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा मला मनातून वाटलं की हा चित्रपट लोकांसमोर आणणं हे माझं कर्तव्य असून ही कथा मला देशासमोर आणावीच लागेल.
हे वाचलंत का? - ‘लव्ह जिहाद’चा गंभीर प्रकार ‘द केरला स्टोरी’मुळे उलगडा
पुढे ते म्हणाले, “अखेर आम्ही आमचं ऑफिस गहाण ठेवून पैसे जमवले आणि चित्रपट बनवला. जेव्हा मी त्या केरळच्या पीडित मुलींना भेटलो तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की जर ही गोष्ट माझ्या बहिणीच्या किंवा मुलीच्या बाबतीत घडली असती तर मी काय केलं असतं? ही सगळी मनातली खंत, राग बाहेर येणं आवश्यक होतं. त्यावेळी मी हे ठरवलं की माझं घर जरी विकावं लागलं तरी चालेल पण मी हा चित्रपट लोकांसमोर आणणार.”
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले होते तर निर्मिती विपुल शाह यांची होती. अभिनेत्री अदा शर्मा हिने केरळमधील हिंदु मुलींचे प्रतिनिधत्व करणारी भूमिका निभावली होती. आता हा चित्रपट ‘झी५’ या ओटीटी वाहिनीवर उपलब्ध आहे.