"२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे वडिलांना सोडून हॉटेलवर गेले!"
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
08-Mar-2024
Total Views | 113
कोल्हापूर : २६ जुलैच्या पुराच्या वेळी उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना सोडून हॉटेलवर गेले होते, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व अन्य उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आल्यावर एकदा मी आलो होतो. त्यावेळी मला इथे माणुसकी पाहायला मिळाली. कोल्हापुरमध्ये एक माळ्यापर्यंत पाणी साचलं होतं. दोन तीन मजले असलेल्या एका घरामध्ये आम्ही गेलो. तिथे एक परिवार तर होताच, पण त्यांची गाय, गुरं आणि पशुधनदेखील त्यांच्यासोबत वरच्या माळ्यावर ठेवलं होतं. किती हे प्रेम? ते एक प्रेम कुठे आणि २६ जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठे, याची तुलना होऊ शकत नाही."
ते पुढे म्हणाले की, "कोल्हापूरमध्ये फार प्रेमळ लोकं आहेत. इथे एकदा शब्द दिला की, तो पाळणारे लोकं आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये येणारा पूर कायमचा बंद व्हावा आणि इचलकरंजीमध्ये पुराचा त्रास होऊ नये, यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ हजार २०० कोटींचा प्रकल्प आपण करतोय. या प्रकल्पातून हा त्रास कायमस्वरुपी बंद होणार आहे," असेही ते म्हणाले. याशिवाय यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांची माहितीही दिली.