मुंबई: आता सरकारच्या पुढाकाराने ' गोलमाल' नंबरचा त्रास टळणार आहे. बेनावी नंबवरून फोन अथवा विविध फसव्या जाहिराती या सगळ्यावर नियंत्रण येणार आहे. कारणही तसेच आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सरकारच्या 'चक्षू ' या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावर टेलिकॉम ग्राहकांना अशा प्रकारे गोलमाल घोटाळेबाज नंबर अथवा जाहिरातींची तक्रार करता येणार आहे.आपला वैयक्तिक नंबर कुठल्याही संस्थेने पसरवल्यास ग्राहकांना त्या घटनेची तक्रार या पोर्टलवर नोंदवता येणार आहे.
संशयित व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह, संस्था यांना याविषयी 'चक्षू' वर तक्रार दाखल करता येईल. अशा कुठल्याही प्रकारचे कृत्य घडल्यास त्या आरोपींवर चौकशी होऊन कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वैष्णव पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. याबद्दल बोलताना त्यांनी,' गेल्या नऊ महिन्यात सरकारने अशा प्रकारे एक कोटी संदिग्ध मोबाईल नंबर बंद केले आहेत ' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
याशिवाय त्यांनी कारवाईबाबत बोलताना,' आम्ही आरबीआय व इतर आर्थिक संस्थांना अश्या प्रकारचे संदिग्ध व्यवहारावर लक्ष ठेवायला सांगितले आहे ' असे म्हणाले. मागील नऊ महिन्यात एक कोटी नंबरवर कारवाई करत १७ लाख मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आले असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
दूरसंचार सचिव नीरज मित्तल म्हणाले की, दोन नवीन पोर्टल प्रत्येक नागरिकाच्या डिजिटल मालमत्तेवरील सायबर सुरक्षा धोक्यांशी सामना करण्यासाठी घेतलेले हे आणखी एक पाऊल आहे.ते म्हणाले की ही नवीन साधने कोणत्याही प्रकारच्या फसव्या माध्यमांना आणि दळणवळण प्रणालीचा गैरवापर रोखण्यास मदत होईल.