मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय दिवे लावले, अशी टीका उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना लाज वाटायला हवी की, ते आज ज्यांच्यासोबत बसले आहेत त्यांनी कलम ३७० हटवण्याला विरोध केला होता, असं वक्तव्यं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलं होतं. त्यानंतर राऊतांनी ही टीका केली.
संजय राऊतांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय दिवे लावले. आपल्या राज्यात ३७० कलम हटवल्यानंतर आजही हजारों काश्मीरी पंडीत निर्वासिताचं जीवन जगत आहेत. त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. आजही काश्मीरी तरुण अस्वस्थ आणि अस्थिर आहेत," असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, यावर भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "कलम ३७० हटवल्यानंतर काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. कधीतरी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला काश्मीरला जा आणि तिथे जो तिरंगा फडकवला जातो त्याकडे बघा," असे ते म्हणाले आहेत.