'परत या, राजा देश वाचवा. आमचे प्रिय राजा अमर राहोत, आम्हाला राजेशाही हवी’ असे म्हणत हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांना जगातून जवळजवळ हद्दपार झालेली राजेशाही पुन्हा हवी आहे. देशातील लोकशाही घालवून, पुन्हा राजेशाही आणण्यासाठी, येथील लोक उत्सुक आहेत. इतकेच नव्हे, तर हे लाखो लोक देशाचा राजधर्म हिंदू करा, अशीही मागणी करत आहेत. कुठे घडतंय हे सगळं? तर हे घडतंय आपला शेजारी देश नेपाळमध्ये. तसेही काही वर्षांपूर्वी नेपाळ हे राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही घोषित असे एकमेव हिंदू राष्ट्र होते. मात्र, नेपाळ कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आला आणि या देशाला सेक्युलरतेचा टिळा बळे बळे लावला गेला.
अर्थात सेक्युलॅरिझम म्हटले की, आपल्या भारतीयांनी जे जे भोगले, तेच तिथेही तेव्हापासून सुरू झाले. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली नेपाळच्या बहुसंख्य हिंदूंचे दमन आणि तिथल्या अल्पसंख्यांकांचे लाडकोड. कारण, लोकशाही असलेल्या देशात नेपाळ कम्युनिस्ट पक्ष हिंदूंचे समर्थन करणार नव्हतीच, नव्हे नेपाळमध्ये २००६ पर्यंत राजेशाही होते. हे सत्ताधारी राजघराणे हिंदूच होते. त्यावेळी नेपाळ प्रखरपणे हिंदू राष्ट्र म्हणूनच ओळखले जात होते. मात्र, सध्याचे नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, जे कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत, त्यांनी ही राजसत्ता उलथवण्यासाठी नाना प्रयत्न केले. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष त्यावेळी पूर्णतः चीनच्या कच्छपी लागला होता. भारत हा हिंदूबहुल देश. संविधानात्मकरित्या हिंदू देश म्हणून घोषित नसला, तरीसुद्धा देश हिंदू संस्कार आणि धर्मपद्धतीनेच चालतो. अशा परिस्थितीमध्ये भारत आणि चीनच्या मधोमध वसलेला नेपाळ जर हिंदू राष्ट्र म्हणून राहिला, तर पुढे-मागे धर्माच्या नावाने या दोन देशांमध्ये दृढ नाते तयार होईल, अशी चीनला भीती होती. त्यामुळे नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला चीनने भरपूर अर्थपूर्ण मदत केली.
अनेक दशके नेपाळमध्ये राजेशाही विरोधात असंतोष पसरवला. त्यामुळे लोकांनीच राजेशाहीला आव्हान दिले. तेथील राजसत्ता संपुष्टात आली. शेवटी दि. २८ मे २००८ रोजी नेपाळ गणतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाले. यामुळे नेपाळमध्ये २४० वर्षांपासून सत्तेत असलेल्या राजेशाही घराण्याची सत्ताही विलुप्त झाली.असो. राजेशाही नको; तसेच निधर्मी राज्य हवे म्हणत, नेपाळमध्ये सरकार स्थापन झाले. पण, त्यामुळे नेपाळच्या हिंदू जनतेच्या धार्मिकतेत काडीचाही फरक पडला नाही. आपल्या देशात प्रभू श्रीरामचंद्र आले होते आणि त्यांनी जनकपुरीच्या जानकीचे स्वयंवर जिंकले होते, अवघ्या भारताचे श्रद्धास्थान असलेले प्रश्रू श्रीराम आणि माता जानकी यांचे नाते नेपाळशी आहे, हे काही नेपाळी हिंदू विसरले नाहीत. त्याचबरोबर जगाला करुणेचा मध्यममार्ग सांगणारे, तथागत गौतम बुद्ध हेसुद्धा नेपाळच्या लुंबिनीचे आणि त्यांनी प्रबुद्ध होत, जगाला शांतीचा मार्ग शिकवला, तो सर्वप्रथम भारताच्या बुद्धगयेत. त्यामुळे माता जानकी असो की तथागत गौतम बुद्ध यांच्यामुळे भारत आणि नेपाळचे संबंध शब्दातीत आणि कधीही न तुटणारे असेच! याच पार्श्वभूमीवर भारतात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या मूर्तीच्या शीला नेपाळच्या काली गंडकी नदीतून आणल्या होत्या. हे जे आहे, ते नेपाळच्या हिंदू माणसाच्या हृदयाच्या भक्तिभावाला पुरून उरणारे आहे.
त्यामुळे नेपाळचा हिंदू माणूस पुन्हा हिंदुत्वाच्या प्रखर धर्मनिष्ठेकडे वळला. याला आणखी एक कारण म्हणजे, नेपाळच्या संबंधित यंत्रणेने जाहीर केले की, मागच्या दोन वर्षांत कतार, तुर्की आणि पाकिस्तानमधून नेपाळच्या २४ कट्टरपंथीय मुस्लीम संघटनांना ५०० कोटींचा निधी दिला गेला. त्यातूनच या संघटना येथे हिंदूना घाबरवण्यासाठी, विविध दहशतवादी कृत्य करत आहेत. परिणामतः काही वर्षांपासून येथे वाढलेल्या दंगली. गेल्याच वर्षी रामनवमीच्या पालखीवर येथील मुस्लीम समुदायाने हल्ला केला. ’सर तन से जुदा’ वगैरेच्या घोषणा दिल्या. नेपाळचे एक खासदार अभिषेक शाहा यांचे म्हणणे आहे की, ”ज्यावेळी पहिल्यांदा नेपाळमध्ये संविधान लागू झाले, तेव्हा नेपाळच्या संसदेमध्ये २६० सदस्य होते. त्यामध्ये केवळ २० सदस्य मुस्लीम होते. मात्र, त्यांनी मागणी केली की, नेपाळचा कायदा शरीयत कायद्यानुसार असावा. त्यामुळे येथे हिंदू राज्य असणे आवश्यक आहे.” नेपाळमध्ये हिंदू राजसत्तेसाठी लोक एकत्र येत आहेत. माता जानकीच्या मायदेशात हिंदू राज्य आले, तर तिच्या सासरी भारतात ते आल्याशिवाय राहणार नाही, असे स्वप्न पाहायला काय हरकत आहे?
योगिता साळवी