बस्तरमध्ये आजही रस्ते जवानांच्या रक्ताने तयार केले जातात....
मुंबई : छत्तीसगढमधील काही गावे मिळून बस्तर हा भाग तयार होतो. तिथे आजही नक्षलवादी आपल्याच देशाच्या जवानांची हत्या करतात. हे क्रुर वास्तव जगासमोर आणण्याचे शिवधनुष्य पुन्हा (Bastar The Naxal Story) एकदा दिग्दर्शक सुदिप्तो सेन, निर्माते विपुल शाह आणि अभिनेत्री अदा शर्मा यांनी उचलले आहे. ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) या वास्तववादी चित्रपटातील वंदे विरम हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. यावेळी बस्तरमधील (Bastar The Naxal Story) शहीद झालेल्या कुटुंबीयांनी या संगीत प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला विशेष हजेरी लावली होती. यावेळी बस्तरमधील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबीयांनी तेथील भयानक वास्तव सांगितले. नक्षलवाद्यांनी त्यांचे जीवन जीवंत असतानाच नर्क कसे केले आहे याची भयाण कथा त्यांनी सांगितली.
पतीच्या निधनाची बातमी ३६ तासांनी समजली
‘वंदे विरम’ या ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ चित्रपटातील गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. यावेळी उपस्थित बस्तरमधील कुटुंबियांनी त्यांच्या घरातील वडिल, भाऊ, पती हे शहीद कसे झाले याची करुण आणि मनाला चटका लावणारी दाहक सत्य परिस्थिती सांगितली. यावेळी उपस्थित शहीद जवानाच्या मुलीने म्हटले की, “२००६ साली बोर्ड परिक्षा सुरु असताना माझे वडिल शाळेत ड्युटीवर होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी युनिफॉर्म घालून माझ्या वडिलांवर हल्ला केला होता आणि त्यात ते शहीद झाले. ज्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले मी वयाने लहान होते आणि माझी बहिण २ महिन्यांचीच होती”. तर एका महिलेने तिच्या पतीच्या निधनाबद्दल सांगताना म्हटले, “कॉंग्रेस परिवर्तन यात्रेत माझ्या पतीला ड्युटी लागली होती. आणि घरी परतत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्हाला त्यांच्या निधनाची वार्ता ३६ तासांनी समजली”.
..त्यादिवशी बस्तरमधील प्रत्येक घरात प्रेतांचा ढीग होता
तर आणखी एका मुलाने त्याच्या वडिलांच्या शहीद झालेल्या त्या काळ्या दिवसाबद्दल सांगत म्हटले, “करवा चौथचा माझ्या आईचा उपवास होता आणि वडिलांना त्यादिवशी सुट्टी देखील होती. परंतु, अचानक काही जवानांना घेऊन जाण्यासाठी ट्रकवर त्यांची ड्युटी लावली आणि तो ट्रक नक्षलवाद्यांनी बॉंम्बने उडवून टाकला. त्यात माझे वडिल शहीद झाले आणि आम्ही पोरके झाले”. दुसऱ्या एका मुलीने तिच्या वडिलांच्या हत्येबद्दल सांगताना म्हटले, “रविवारच्या दिवशी घरी फोन आला की गावातील लोकांना नक्षलवाद्यांनी बंदीस्त करुन ठेवले आहे. त्यांना वाचवण्यासाठी सर्व जवानांना बोलावण्यात आले. कारण नक्षलवाद्यांना माहित होते की गावकऱ्यांना वाचवण्यासाठी जवान येणार आणि त्यांचा क्रुर हेतु साध्य झाला. माझ्या वडिलांसह अनेक जवान तिथे गेले आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यादिवशी गावातील प्रत्येक घरात प्रेतांचा ढीग झाला होता”. बस्तरमधील त्या प्रत्येक कुटुंबीयांनी आपल्या घरातून एक किंवा दोन व्यक्तींना गमावले होते.
आजही बस्तरमध्ये शाळा, रस्ते, वीजपुरवठा नाही आहे. याबद्दल बोलताना एक व्यक्ती म्हणाली की, बस्तरमध्ये रस्ते डांबराने नाही जवानांच्या रक्ताने बनवले जातात. त्यांची ती वाक्ये ऐकून उपस्थितांच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांचा बस्तरचा अंगावर काटा आणणारा इतिहास ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून १५ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.