ग्रामीण महिलांच्याउपस्थितीत पहिल्यांदाच आयोजित केलेला महिला सशक्तीकरण सोहळा रविवार, दि. १० मार्च रोजी वाडा तालुक्यातील गालथरे गावातील गोवर्धन ईकोव्हीलेज येथे यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याचे शब्दचित्रण या लेखात केले आहे.
'सेवा सहयोग फाऊंडेशन’ ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील गावांच्या विकासाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आखत कार्य करीत आहे. शिक्षण, शेती, विज्ञान, पर्यावरण, स्वयंरोजगार, जनजागृती यासोबतच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. गेल्या वर्षभरापासून संस्थेच्या ‘ग्राम विकास प्रकल्प’मार्फत महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने, ’ग्राम सशक्तीकरण वर्ग’ महिन्यातून एकदा घेतले जात होते. या वर्गातून स्वाभिमान, स्वयंरोजगार, ग्रामीण महिलांना असलेलेआर्थिक स्वातंत्र्य, रोजगाराची साधने, सामाजिक नेतृत्वातील महिलांची भूमिका, सेवा आणि परोपकार अशा विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा, खेळ इत्यादींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावपाड्यावरील महिलांचे जागरण करण्यात येते,अशा संस्थेशी जोडलेल्या महिलांचे एकत्रीकरण करून त्यांच्यातील मातृशक्तीचा जागर घडवून आणण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पालघर तालुक्यातील १६, डहाणू तालुक्यातील दोन, वाडा तालुक्यातील तीन अशा एकूण २१ गावपाड्यातील महिला उपस्थित झाल्या होत्या. सकाळी १० वाजता सर्व महिला, कार्यकर्त्या आणि स्वयंसेवकांचे आगमन गोवर्धन ईकोव्हीलेजमध्ये झाले.
अल्पोपहार घेऊन झाल्यानंतर पतीदास प्रभुजी यांनी ईकोव्हीलेजच्या विविध सामाजिक उपक्रम पाहण्याच्या परिक्रमेला सुरुवात केली. सर्वप्रथम प्रभूजींनी तेथील बियाणे बँकबद्दल माहिती दिली, त्यानंतर मुक्त शेळीपालन,पावसाचे पाणी साठविण्यासाठी निर्माण केलेला तलाव, प्रशस्त गोशाळा, वरकस जमिनीवर केलेली पैशाच्या पिकांची लागवड आणि सांडपाणी प्रकिया प्रकल्प, सौरऊर्जा तंत्रज्ञान इत्यादी गोष्टी सर्व महिलांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता आल्या.भोजनोत्तर वेळेत सर्व जमाव बाजूच्याच इमारतीमधील सुंदरशा एका सभागृहात एकवटला. तिथे सुरुवात झाली, पहिल्यावहिल्या ग्रामीण महिला सक्षमीकरण पुरस्कार सोहळ्याला!रंगीबेरंगी साड्या परिधान केलेल्या महिलांनी खचाखच भरलेल्या सभागृहाच्या व्यासपीठावर विशेष अतिथींच्या रुपात विराजमान होत्या. राज्यशास्त्र विषयात ‘एम.ए’ आणि ‘सेट’उत्तीर्ण व आता मुंबई विद्यापीठातून ‘आदिवासी समाज’ विषयावर संशोधन करणार्या, तीन हजार आदिवासी महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देणार्या ‘आसमंत सेवा’ संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षा, माजी राज्यमंत्री विष्णुजी सावरा यांच्या कन्या निशा विष्णु सवरा. त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या चार दशके दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सकस प्राथमिक शिक्षण देत अनेक उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम केले, अशा विरारच्या सुप्रसिद्ध रश्मीबाई अर्थातच रश्मी विवेक चौधरी आणि त्यांच्यासोबतच विरार गावाचा चेहरामोहरा बदलण्यात ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आणि खासगी शिकवणीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनादेखील घडवले, असे विवेक चौधरी सर या प्रमुख पाहुण्यांच्या सोबत होते. ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ संस्थेच्या प्रभावी महिला कार्यकर्त्या आरती नेमाणे आणि किशोरी विकास प्रकल्प मार्गदर्शक समितीच्या प्रभावी सदस्या वर्षा परब आणि ग्राम विकास प्रकल्प प्रमुख अक्षय वणे.
पुरस्काराचा श्रीगणेशा मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाबाई भोसले आणि स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कऱण्यात आला. ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ संचलित सफाळेमधील सह्याद्री सपोर्ट क्लासच्या शिक्षिका आणि प्रभावी स्वयंसेवक सुजाता मोरे यांनी सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची उत्तम सुरुवात केली.विशेष अतिथी निशा यांनी ’कुटुंबाच्या विकासातील ग्रामीण भागातील महिलेची भूमिका’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी मातृशक्तीचे महत्त्व महिलांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर आरती ताई यांनी ’मुलांच्या जडणघडणीत आईची मोलाची भूमिका’ हा विषय मांडत आपल्या अमोघ वाणीतून त्यांनी आपल्या मुलींच्या व मुलांच्या वागणुकीवर आईने लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे, यावर उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले.पुढील सत्रात ज्येष्ठ शिक्षिका रश्मी बाईंनी आपल्या खास शिक्षकी शैलीत ’शिक्षणाचे कुटुंब विकासातील महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. पुढील सत्रात उमेश सावंत यांनी सूत्रसंचालन हाती घेत, विविध पुरस्कार व्यासपीठावरून जाहीर केले आणि उपस्थितांच्या हस्ते ते प्रदान केले. इथे विशेष सांगावेसे वाटते की, जास्तीत जास्त महिलांशी संपर्क, संवाद साधणे हे कार्य आपले ‘कृषी विकास’ कार्यक्रमाचे समन्वयक रोहन शिवदेदादा आणि त्यांची रोहित, सुभाष, प्रथम अशी टीम, अभ्यासिका समन्वयक अविनाश नम आणि हाडाची पालघर जिल्हा किशोरी विकास समन्वयक पुनमताई व तिची किशोरी विकास प्रमुख टीम, नवनिर्वाचित बोईसर विभाग समन्वयक दिप्तीताई आणि ग्रामीण अभ्यासिका प्रकल्प समन्वयक मयूरदादा व त्यांचे अभ्यासिका प्रमुख आणि या सर्वांची मोट बांधणारे आपले उमेशजी यांना जाते.
मानचिन्ह, साडी, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन पालघर जिल्ह्यातील दहा महिलांना प्रभावी महिला शेतकरी पुरस्कार, तीन वयोवृद्ध पण कार्याने चिरतरुण अशा महिलांना समर्थ महिला सन्मान पुरस्कार, लाखो रुपयांची उलाढाल करू शकणार्या सहा महिलांना ‘प्रभावी महिला उद्योजिका सन्मान पुरस्कार’, संस्थेच्यामार्फत असाधारणकार्य करणार्या चार महिलांना प्रभावी महिला कार्यकर्ता सन्मान पुरस्कार, नव्या पिढीतील समाजासाठी निःस्वार्थ सेवा देणार्या चार युवतींना प्रभावी ‘महिला स्वयंसेवक सन्मान पुरस्कार’, विशेष कामगिरी करणार्या तीन युवतींना ‘विशेष महिला गौरव पुरस्कार’ आणि जिल्ह्यातील किशोरी मुलींच्या आयुष्यात प्रभावी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आपल्या पूनमताईचा विशेष प्रभावी महिला कार्यकर्ता सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.पहिल्यांदाच विशेष ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला तो जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांच्यां आयुष्याला आकार देणार्या शिशुमंदिर शिक्षण संस्थेचा आणि विरार नगर परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त, ४१ वर्षे समाजासाठी निःस्वार्थ भावनेने झटलेल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, मराठी शाळा जगली पाहिजे म्हणून धडपड करणार्या रश्मी विवेक चौधरी बाई यांना!रश्मी बाईंचा परिचय संस्थेचे कार्यकर्ता आणि बाईंचा एक विद्यार्थी, ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ संस्थेचे कार्यकर्ता म्हणून मी मांडला. बाईंचा सत्कार आरतीताई आणि वर्षाताई यांच्या हस्ते मानचिन्ह, साडी, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. बाईंना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सोबतच विवेक चौधरी सर यांचादेखील शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपादरम्यान ग्राम विकास अधिकारी उमेशदादा यांनी उपस्थितांचे, ईको व्हीलेजच्या सहकारी प्रभुंचे, कार्यकर्ता आणि स्वयंसेवक यांचे आभार मानले आणि पसायदान मागून कार्यक्रमाचा समारोप केला.आपल्या प्रकल्प मार्गदर्शक समितीच्या सदस्या डॉ. अंजलीताई यांनी अल्पावधीतप्रभावी संपर्क करीत निशा सवरा यांच्यासारख्या उत्तम वक्ता उपलब्ध करून दिला. यावेळी राजेंद्रदादा यांनी उत्तम छायाचित्रे संपादित करून दिली. प्रियांका, अक्षता यांनी कमी वेळेत सदर कार्यक्रमासाठी सुंदर चित्रफिती करून देण्याची जबाबदारी पेलली,’नॉलेज ऑन व्हील’च्या उर्मिला ताई यांनी आपल्या संपर्कातील महिलांना जोडले, पूनमताई हिने एकहाती संपूर्ण प्रवास व्यवस्था पाहत २९ गाड्यांची व्यवस्था केली. उमेश दादा यांनी २९ वाहकांचा यथायोग्य सत्कार करत त्यांना सेवा सहयोग पोहोचवला, मयुरच्या विनंतीला मान देत नवी मुंबईतील आपला प्रभावी स्वयंसेवक श्रेयस कलोसे उपस्थित होता आणि अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालघर तालुका समितीच्या आपल्या महिलांनी इतक्या महिलांना कार्यक्रमासाठी आणण्याची जबरदस्त भूमिका बजावली.अरे हो, एक सांगायचे कसे विसरू शकतो. आपल्या ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ संस्थेच्या प्रकल्पाचे म्हणा किंवा इतर योजनांचे प्रसारण प्रभावीपणे करण्यासाठी आपण सेवा सहयोग सखी आयडी कार्डचे पहिले अनावरण केले. त्यामुळे आता पाड्यावरील महिलेच्या विकासासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणारी महिला ही ‘सेवा सहयोग’ सखी असेल हा!
अक्षय वणे