गाव चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार! बावनकुळेंची माहिती
मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणार
03-Feb-2024
Total Views |
मुंबई : भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी ४ ते ११ फेब्रुवारी या काळात 'गाव चलो अभियान' राबविण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शुक्रवारी भाजपच्या मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री यांच्यासह आपण स्वतः अमरावती जिल्ह्यातील साऊर येथे एक दिवस राहणार आहोत."
"आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार आहेत," असेही ते म्हणाले. यावेळी आ. योगेश सागर, आ . पराग आळवणी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
महत्वाचे नेते सहभागी होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा (ता. कळमेश्वर ), भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार हे गुरामवाडी (ता . मालवण), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे एक दिवस मुक्कामास जाणार आहेत. पीयूष गोयल, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे केंद्रीय मंत्रीही या अभियानात सहभागी होणार आहेत. शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विलेपार्ले येथे या अभियानात सहभागी होणार आहेत," असेही बावनकुळेंनी सांगितले.
३२ हजार सुपर वॉरियर्सचे सहकार्य
याअंतर्गत ५० हजार युनिट्समध्ये भाजपचे ५० हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी राज्यभरातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना ३२ हजार सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल. प्रत्येक युनिटमध्ये भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करतील, अशी माहिती, बावनकुळे यांनी दिली.
३.५ लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट
५० हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण ३.५ लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने युवकांसाठी ‘नमो चषक’ तसेच महिलांसाठी ‘शक्ति वंदन कार्यक्रम’ देखील राबवण्यात येत आहे. लवकरच पंतप्रधान मोदी हे शक्तिवंदन कार्यक्रमाद्वारे महिला बचत गट प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याची माहितीही बावनकुळेंनी दिली.