पाक जनतेने सेनेचा पराभव केला; पण?

    17-Feb-2024
Total Views | 92
Pakistan Election results
पाकिस्तानमध्ये दि. 8 फेब्रुवारी रोजी पार पाडलेल्या सार्वत्रिक आणि प्रांतीय निवडणुकांच्या निकालांकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे हिंसाचार, मतपेट्यांची पळवापळव, उमेदवारांवर हल्ले असे हिंदी सिनेमामधील दृश्यांनाही लाजवतील, असे कित्येक प्रसंग घडले. तब्बल तीन ते चार दिवसांनी निकालाचे चित्र स्पष्ट झाले आणि इमरान खान समर्थक अपक्षांनी पाकिस्तानात बाजी मारली खरी. पण, त्यांना बहुमताने हुलकावणी दिल्याने, अखेरीस राजकीय वाटाघाटी आणि तर्कवितर्कांनंतर तिथे इमरान खान विरोधकांनी पुन्हा एकत्र येत आघाडीच्या सरकार स्थापनेवर एकमत दर्शविले. त्यानुसार नवाज शरीफ ऐवजी त्यांचेच बंधू शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानाची धुरा स्वीकारतील, हे आता निश्चित. पण, या निवडणुकीच्या निकालांमुळे पाकिस्तानी सैन्याचाही पराभव झाला. पाकिस्तानी मतदारांनी सैन्याची निवड मतपेटीतून अगदी स्पष्टपणे नाकारली असली, तरी दुर्दैवाने बेरजेच्या राजकारणात मात्र शरीफ-भुट्टोंनीच सत्ता हस्तगत केली. तेव्हा, पाकिस्तानमध्ये निवडणूक काळातील घडलेल्या घटना, येथील पक्षीय राजकारण आणि पाकिस्तानचे भवितव्य यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...

माजी पंतप्रधान इमरान खान तुरुंगात, तर दुसरे हद्दपार माजी पंतप्रधान नवाज शरीफ लष्कराच्या कृपेमुळे निर्दोष ठरून सक्रिय राजकारणात, हा प्रकार पाकिस्तानातच घडू शकतो! जन्माला आल्यापासून पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात लष्कराचा धुडगूस सुरूच आहे. यंदाच्या निवडणुकीत तर लष्कराने उघडपणे नवाज शरीफ यांना पाठिंबा दिला. राजकीय कटपुतळ्यातील या बाहुल्यांची दोरी लष्करप्रमुख मुनीर यांचे हाती असल्यामुळे, राजकीय खेळखंडोबा पाकिस्तानातच घडू शकतो, हे जगजाहीर आहे. पाकिस्तानात लष्कराने केलेल्या निवडीला निवडणूक स्वरुपात मांडले जाते, असे म्हणतात. पण, यावेळी 2024 मध्ये जनतेच्या मनात काही वेगळेच सुरू होते की, काय असे वाटते आहे. तसे नसते तर नेता तुरुंगात आणि त्याच्या समर्थकांची विजयाच्या दिशेने घोडदौड, असे चित्र दिसले असते का? मतदारांच्या विशेषतः तरूण मतदारांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज लष्कराला आला नाही, हेच खरे.पण, निवडणुकांचे निकाल लागूनही कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे, तेथे सरकार स्थापन होण्यात अडचणी येत होत्या. बराच काळ 75 जागा मिळवणारा, नवाज शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ गट) हा पक्ष आणि 54 जागा मिळविणारा बिलावल भुत्तो यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ यांच्यात वाटाघाटीचे गुर्‍हाळ सुरू आहे. पण, सदस्यांची एकूण बेरीज 129 होत होती. म्हणून सध्या छोट्या पक्षांची चलती सुरू झाली होती.


यावेळी माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इमरान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी शतक ठोकून (101 जागा) प्रत्येक अधिकृत राजकीय पक्षाला मागे टाकले. निवडणूक आयोगाने इमरान खान यांच्या पक्षाची मान्यता रद्द केल्यामुळे, त्यांचे समर्थक अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत होते. तुरुंगात असूनही इमरान खान यांच्या बाजूच्या नेत्यांना/ समर्थकांना मतमोजणीत पाठिंबा मिळताना दिसत होता. नवाज शरीफ यांना पराभवाचा सामना तर करावा लागणार नाही ना, असे लोक हलक्या आवाजात बोलू लागले होते. इमरान खान यांच्या पक्षाचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार 265 पैकी 154 जागांवर आघाडी घेतात की काय, हे लक्षात येताच, पाकिस्तान निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करायला विलंब लावायला सुरवात केली आहे, असे एकंदरीतच मत व्यक्त होऊ लागले होते.

पाक निवडणुकीतील काही उल्लेखनीय निकाल


खुद्द नवाज शरीफ यांचा मनसेहरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शहजादा गस्तासाप यांनी 11 हजारांपेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव केला. हा मनसेहरा मतदारसंघ नवाज शरीफ यांचा गड मानला जातो. मात्र, मनसेहरा व्यतिरिक्त नवाज शरीफ यांनी लाहोर येथूनदेखील उमेदवारी दाखल केली होती आणि तिथे ते विजयी झाले. यावेळी बहुतेक बड्या नेत्यांनी दोन ठिकाणांहून निवडणूक का लढविली, यावर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नसावी.दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद यालाही पाकिस्तानी जनतेने निवडणुकीत पराभूत केले आहे. तो ‘मरकजी मुस्लीम लीग’ या पक्षाचा उमेदवार होता. हीच गत बहुतेक सर्व दहशतवादी उमेदवारांची किंवा त्यांच्या कट्टर समर्थकांची झालेली दिसते, हे वृत्तही नोंद घ्यावी असेच आहे.

पाकिस्तानमधील विधानसभागृहे
इस्लाम हा अधिकृत धर्म असलेल्या, पाकिस्तानमध्ये 12.8 कोटी मतदारांनी गुरुवार, दि. 8 फेब्रुवारीला मतदान केले. 1947 मध्ये फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या 24 टक्क्यांपेक्षा जास्त होती. आज ती एक टक्केही नाही. पाकिस्तानमध्ये संसद आणि प्रांतांमधील विधानसभेच्या निवडणुका या एकाचवेळी घेतल्या जातात. पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेम्ब्ली’मध्ये (संसद) 336 सदस्य असतात. यापैकी 266 सदस्य भारताप्रमाणे एकल सदस्य मतदारसंघातून निवडण्यात येतात. म्हणजे बहुमतासाठी 134 जागी विजय संपादन करावा लागतो. सिंधमधून 61, पंजाबमधून सर्वात जास्त म्हणजे 141, इस्लामाबाद या राजधानीच्या शहरातून तीन, खैबरपख्तुनख्वामधून 45 आणि बलुचिस्तानमधून 16 सदस्यांची निवड करायची असते. 60 महिला सदस्य राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांच्या प्रमाणात त्या- त्या पक्षांकडून भरल्या जातात. अशाच प्रकारे दहा जागा मुस्लिमेतरांमधून राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांच्या प्रमाणात निवडल्या जातात.‘नॅशनल असेम्ब्ली’ व प्रांतांच्या विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी होतात. प्रांतशहा आमदारांची संख्या व बहुमत असे आहे. अन्य किंवा इतरांमध्ये महिला व अल्पसंख्यांक येतात.

1) पंजाब : सर्वसामान्य जागा 297 + अन्य 74 = एकूण 371. पंजाब प्रांतात पीएमएल (एन)ला 167 जागा मिळाल्या म्हणजे बहुमतासाठी(186) 19 जागा कमी पडतात. इमरान खान यांच्या पक्षाला (अपक्ष) 116 जागा मिळाल्या पीपीपीला फक्त सात जागा आहेत. पंजाब पाकिस्तानचे शक्तिकेंद्र मानले जाते. पण, सध्या तिथे त्रिशंकू स्थिती आहे.

2) सिंध ः सर्वसामान्य जागा 130 + अन्य 38 = एकूण 168. सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टीला 98 जागा मिळाल्या आहेत. अशाप्रकारे पीपीपीला बहुमत मिळाले आहे. इमरान समर्थकांना 30 जागा, तर एमक्यूएमपीला 21 जागा मिळाल्या आहेत.

3) खैबरपख्तुनख्वा ः सर्वसामान्य जागा 115 + अन्य 30 = एकूण 145. या प्रांतात इमरान खान समर्थकांना 84 जागा मिळाल्या. उरलेल्या इतर पक्षांत विखुरल्या गेल्या आहेत.

4) बलुचिस्तान ः सर्वसामान्य जागा 51 + अन्य 14 = एकूण 65. बहुमतासाठी 33 जागा हव्यात. पीपीपी-11, जेयुआय -11, पीएमएल(एम) दहा उरलेल्या जागा अन्य पक्षांना मिळाल्या आहेत. म्हणून (त्रिशंकू) स्थिती आहे.

पाकिस्तानची सिनेट


पाकिस्तानमध्ये यंदा सिनेटच्या निवडणुका झाल्या नाहीत. सिनेटमध्ये 104 जागा असतात. प्रत्येक प्रांताची विधानसभा 14 सदस्य सहा वर्षांसाठी निवडून पाठवते. ‘फेडरली अ‍ॅडमिनिस्टर्ड एरिया’ (एफएटीए) मधून आठ सदस्य निवडून पाठविले जातात. एक महिला आणि एक टेक्नोक्रॅट फेडरल कॅपिटलमधून निवडून पाठविले जातात. चार महिला आणि चार टेक्नोक्रॅट यांची निवड प्रत्येक प्रांताची विधानसभा करते. प्रत्येक प्रांतासाठी एक जागा अल्पसंख्यांकासाठी असते. याबद्दलची प्रत्यक्ष कारवाई नंतर होईल.

मतमोजणी पद्धती

मतमोजणीसाठी ’ईव्हीएम’ मशीन्सचा वापर केला जावा, असा इमरान खान यांचा आग्रह होता. पण, यावेळी दि. 8 फेब्रुवारी 2024ला झालेल्या निवडणुकीत मतपत्रिकाच वापरण्यात आल्या. मतदान संपल्याच्या एका तासानंतरच मतमोजणीला सुरुवात केली जाते, तशीच ती यावेळीही सुरू झाली. पण, लष्कराला नको असलेले उमेदवार विजयी होत आहेत, हे लक्षात येताच, मतगणना अनेक ठिकाणी रेंगाळली, अडली, अडविली गेली, हल्लाग्रस्तही झाली.

राष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत


पाकिस्तानचे राष्ट्रपती अरीफ अल्वी फारसे बोलत नसतात. पण, या गोंधळाच्या आणि निकाल उशिरा लागण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना इमरान खान यांच्या शासनाच्या (ईव्हीएम) ’इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन्स’ अमलात आणण्याच्या प्रयत्नांची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. “ ’ईव्हीएम’चा वापर केला असता, तर आज झालेले गोंधळ झाले नसते आणि निकाल लागण्यास इतका उशीरही लागला नसता,” असे ते म्हणाले. त्यांनी ट्विटरवर नमूद केले की, ‘’जर ईव्हीएमचा वापर केला असता, तर माझ्या प्रिय पाकिस्तानमध्ये असा गोंधळ झाला नसता. याप्रश्नी 50 पेक्षा जास्त बैठकी झाल्या; पण शेवटी हा विचार काही मार्गी लागला नाही.” या निवडणुकीत तरूण नुसते बोलत नव्हते, तर ते गर्जना करीत होते, याची ही त्यांनी नोंद घेतली आहे.

पाकिस्तानामधील प्रमुख पक्ष


पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय पक्ष असले, तरी 14 पक्ष मुख्य आहेत. यातही तीन बर्‍यापैकी मोठे म्हणावेत असे आहेत.

1) पाकिस्तान तेहरिक-ए-इनसाफ (न्यायाचा आग्रह धरणारा पक्ष) (पीटीआय) या पाकिस्तानमधील राजकीय पक्षाची स्थापना 1996 मध्ये मुळात पाकिस्तानी क्रिकेटपटू असलेल्या राजकारणी इमरान खान (वय-71) यांनी केली आहे. त्यांनी 2018 ते 2022 पर्यंत देशाचे पंतप्रधान पद भूषविले. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. पीटीआय या पक्षाची विचारधारा पाकिस्तानला एक आधुनिक इस्लामी गणराज्य बनवण्याची आहे. ‘पीटीआय’ हा पाकिस्तानमधील सर्वात वेगाने वाढलेला पक्ष मानला जातो. पाकिस्तानमधील तरूण मतदार इमरान खान यांच्याकडे घराणेशाहीला पर्याय म्हणून पाहतात.माजी पंतप्रधान इमरान खान यांना पाकिस्तानमध्ये निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करण्यात आला. आधी इमरान खान यांना पदच्युत केले, नंतर त्यांना निरनिराळ्या खटल्यांत अडकवले, नंतर तुरुंगात टाकले आणि शेवटी त्यांच्या पक्षावर बंदी आणली. 2018ची निवडणूक जिंकून, ते पंतप्रधानपदी स्थानापन्न झाले होते. पुढे एप्रिल 2022 मध्ये अविश्वास ठराव पारित झाल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून ते विरोधी पक्ष नेता म्हणून अटक होईपर्यंत काम करीत होते.चार गुन्ह्यांच्या निमित्ताने तुरुंगामध्ये असूनही, इमरान खान पाकिस्तानमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या पक्षाचे ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले आहे.


‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या त्यांच्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे, तरीही कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा व तुरुंगवासात टाकल्यामुळे जनतेत उसळलेली संतापाची लाट यांच्या भरवशावर इमरान खान यांचा पक्ष(?) 2024ची निवडणूक जिंकेल, निदान ते किंगमेकरच्या भूमिकेत तरी येतील, यात शंका नव्हती. पण, लष्कराने त्यांना असे करू दिले नाही.इमरान खान यांनी भारताबद्दल बोलताना म्हटले आहे की, “अदलाबदलीच्या (क्विड-प्रो-को) तत्त्वाला अनुसरून भारत व पाकिस्तान यातील संबंध सुधारू शकतात.” पाकिस्तानच्या चांगल्या व्यवहाराच्या बदल्यात तसाच व्यवहार भारताकडूनही मिळेल, यावर त्यांनी भरवसा ठेवला आहे. मोदींचे पाकिस्तानमध्ये स्वागत करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, तसा योग आला नाही. 2019 मध्ये इमरान खान यांनी मोदींना ‘शांततेत राहण्याचा प्रयोग करून पाहूया’ असे आवाहन केले होते. ‘पुलवामा हल्ल्याबद्दल पुरावा द्या, लगेच कारवाई करीन,’ असे आश्वासनही त्यांनी आपल्याकडून दिले होते. युद्धविरामाचा पुरस्कार करीत ते म्हणाले होते की, ”सर्व प्रश्न चर्चेच्या मार्गाने सोडवू या.” उक्ती आणि कृती यात महदंतर होते. घुसखोरी, छुपे हल्ले काही थांबले नाहीत. कितीही चांगले वाटले, तरी नुसते शब्दांचे बुडबुडे काय कामाचे?

इमरान खान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता


मान्यता रद्द केलेल्या पक्षाचे नेते इमरान खान यांनी तुरुंगातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, नवाज शरीफ यांच्या इतकीच भाषणे दिली. यासाठी प्रथम ते तुरुंगातच भाषणाचे टिपण तयार करीत. ते टिपण भेटायला येणार्‍या वकिलाबरोबर बाहेर पाठवीत. कार्यकर्ते या टिपणांवरून भाषणे तयार करीत. त्यांच्या जुन्या रेकॅार्टेड भाषणातून त्यांचा आवाज नवीन भाषणातील लिखित भाषणातील शब्दांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने दिला जायचा आणि ही भाषणे जनतेला ऐकवली जायची! हे सर्वकाही या कानाचे त्या कानाला कळले नाही.
 
2) पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) (पीएमएल) नवाज शरीफ-( वय 74)


पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) हा पाकिस्तानमधील एक उजव्या विचारसरणीचा, उदारतावादी तसाच रूढीवादी राजकीय पक्ष. सध्या सिनेटमध्ये हा तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 1993 मधली. मूळचा रुढीवादी असलेला हा पक्ष आज मात्र सामाजिक आणि सांस्कृतिक बाबतीत उदारमतवादी झाला आहे, तरीही तो मुस्लिमांमधील कट्टरतावादी घटकांना अधूनमधून कुरवाळीत असतोच, असा त्यांच्यावर आरोप आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानमधील सर्वच पक्ष कट्टरता, भारतद्वेष, काश्मीरवर स्वामित्व आदी बाबतीत आघाडीवरच असतात.

शरीफ हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधले एक मोठे श्रीमंत व्यापारी कुटुंब. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ अनेक वर्षांच्या तुरुंगवासानंतर नुकतेच परतले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होते. पण, आता न्यायालयांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप अमान्य करून, त्यांना मुक्त केले आहे. अगोदर झालेली शिक्षा आणि आता मिळालेली मुक्तता, या दोन्ही बाबी अनुक्रमे लष्कराच्या अवकृपा आणि कृपेमुळे घडल्या होत्या, असे सर्वत्र मानले आणि बोलले जाते आहे. परत आल्यानंतर नवाज शरीफ यांनी भारतासोबत शांततायुक्त सहजीवनाचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यासाठी अशक्य अशी अट टाकली आहे. कोणती आहे ही अट? ’370 कलम’ पुन्हा प्रस्थापित करा, ही ती अट आहे. भारत ही स्वीकारणार नाही, हे काय शरीफ यांना कळत नाही होय? मग तरीही अशी अट घालण्यामागचे कारण काय? तर आम्ही आमच्याकडून शांतता प्रस्ताव दिला होता, हे सांगायला पाकिस्तानला संधी मिळते, हे या प्रस्तावामागचे कारण आहे. नवाज शरीफ अज्ञातवासातून लष्कराच्या बदललेल्या मर्जीनुसार पाकिस्तानात परत आल्यानंतर म्हणाले होते की, “भारताने भरपूर प्रगती केली आहे, तसेच जगभर नावही कमावले आहे.“ अशी साखरपेरणी ते का करीत असावेत? “शेजारचा देश चंद्रावर गेला आणि पाकिस्तान मात्र आजही अस्तित्वाचीच लढाई लढतो आहे,“ हे त्यांचे उद्गार प्रामाणिक आहेत, यात शंका नाही.



पण, पाकिस्तानची ही अशी केविलवाणी स्थिती का आणि कशी झाली, याबाबत मात्र शरीफच नव्हे, तर पाकिस्तानातील कोणताही पक्ष किंवा नेता आत्मचिंतन करायला तयार नाही. शरीफ यांना भारताशी सख्य हवे आहे, असे मानणारे अनेक आहेत. पण, लष्कराकडून तसे संकेत जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानमधला कोणताही राजकीय नेता पुढे पाऊल टाकू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग मुनीर या विद्यमान लष्करशहांकडून काही सूचना मिळाल्यामुळे, तर ही साखरपेरणी नाही ना? ”आपापसात लढण्यापेक्षा आपण गरिबीविरुद्ध लढू.” हे मोदींचे आवाहन एकवेळ पाकिस्तानी जनतेला पटेल, शरीफ यांच्यासारख्या राजकीय नेत्यांनाही कदाचित पटेल; पण मुल्ला, मौलवी आणि लष्करशहा जोपर्यंत या विचाराशी सहमत होत नाहीत, तोपर्यंत काहीही होणे नाही, हे नक्की आहे. या दोन घटकांचे मतपरिवर्तन होणे सध्यातरी शक्य नाही. कुत्र्याचे शेपूट सरळ थोडीच होणार आहे? मोदींनी पाकिस्तानला अवचित भेट दिल्यानंतर, तर आता चेंडू पाकिस्तानच्या पारड्यात गेला आहे. पण, शरीफ निवडून आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये परिस्थिती काहीशी निवळेल आणि मर्यादित प्रमाणात व्यापरसंबंधही प्रस्थापित होतील, असे मानणारा एक गट जागतिक राजकीय पटावर आहे. खुद्द राजकीय पक्षाचा कारभार जर लोकशाही तत्त्वांना अनुसरून चालत नसेल, तर पक्षात आणि पुढे राजकारणात घराणेशाही कशी फोफावते, याचे उदाहरण पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) (पीएमएल) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी- पीपीपी या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरून लक्षात येईल.



3) पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) 1967 मध्ये स्थापन झालेला हा डावीकडे झुकलेला पक्ष आहे. झुल्पिकारअली भुट्टो यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली होती. लोकशाही, सामाजिक न्याय, लष्करी सामर्थ्य यांवर या पक्षाचा भर आहे. 1970, 1977, 1988, 1993 आणि 2008 मध्ये हा पक्ष पाकिस्तानात सत्तेवर होता,तर 1990, 1997, 2002 आणि 2013 मध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. 2018 मध्ये मात्र हा पक्ष ना सत्तेवर होता ना, सर्वात मोठा विरोधी पक्ष होता.बिलावल भुट्टो-झरदारी (वय 35) हे सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानच्या पहिल्या मोठ्या महिला नेत्या बेनझीर भुट्टोंचे हे चिरंजीव. बेनझीर दोनदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी होत्या. 2007 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. बिलावल यांचे वडील आसिफ अली झरदारी हे 2008 ते 2013 या काळात पाकिस्तानचे 11वे अध्यक्ष (पंतप्रधान नव्हे) होते. 2022 मध्ये आघाडी सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री झाले. नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ हे यावेळी पंतप्रधानपदी होते; कारण इमरान खान यांना 2022 मध्ये अविश्वास प्रस्तावामुळे पायउतार व्हावे लागले होते. नवाज शरीफ जर 2024च्या निवडणुकीत निवडून आले, तर त्यांच्या हाताखाली आपण पद स्वीकारणार नाही, असे बिलावल भुट्टो यांनी जाहीर केले आहे. भारताने टुरिझिम कॉन्फर्न्सचे यजमानपद स्वीकारून, तिचे आयोजन काश्मीरमध्ये केले, तेव्हा बिलावल यांनी भारतावर टीका केली होती. ’जी-20’च्या यजमानपदाचा भारताने दुरुपयोग केला, असाही त्यांचा आरोप होता. ’370 कलम’ हटवले, तेव्हाही त्यांनी भारतावर टीका केली होती. ‘पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करायचे आहेत; पण भारताची वागणूक एखाद्या आडदांड हिंदुत्वनिष्ठ, दहशतवादी राष्ट्राप्रमाणे असल्यामुळे हे शक्य होत नाही,’ असा त्यांचा कांगावा. म्हणून भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बिलावल यांचा समाचार घेताना, ‘पाकिस्तान हा देशच ओसामा बिन लादेनचे यजमान राष्ट्र तसेच दहशतवादी गुन्हेगार राष्ट्र कसे आहे,’ हे स्पष्ट करून परतफेड केली. बिलावल हे अपरिपक्व राजकारणी आहेत, हे दाखविणारी अनेक उदाहरणे आहेत. ते विजयी झाल्यास भारत आणि पाकिस्तान यातील संबंध विकोपाला जातील, असे राजकीय निरीक्षकांचे मत होते. बिलावल भुट्टो यांची पिताश्री आसिफ अली झरदारी पाकिस्तानमध्ये ‘मिस्टर टेन पर्संट’ या नावाने ओळखले जातात. कोणतेही काम करवून घ्यायचे असेल, तर त्याच्यासाठी ते दहा टक्के कमिशन मागत, अशा शब्दात त्यांची चेष्टा केली जाते.

गेल्या निवडणुकीत 2018 मध्ये पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या इमरान खान यांच्या पक्षाला 32 टक्के मते व 116 जागा मिळाल्या होत्या आणि मतांची संख्या व टक्केवारी यात पीटीआयने आघाडीही मिळविली होती. 2018 मध्ये पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) (पीएमएल) या नवाज शरीफ यांच्या पक्षाला 24 टक्के मते व 64 जागा मिळाल्या. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पक्षाला 13 टक्के मते व 43 जागा मिळाल्या. जमाइत-ए- इस्लाम या फाझी-उर-रहमान यांच्या पक्षाला 11 जागा मिळाल्या. उरलेल्या जागा दहा लहानलहान पक्षात वाटल्या गेल्या होत्या. इमरान यांनी खान इतर पक्षांशी आघाडी करीत सरकार स्थापन केले. पण, त्यांचे लष्करी नेत्यांशी पटेना म्हणून त्यांच्याविरुद्ध नॅशनल असेम्ब्लीत अविश्वास प्रस्ताव पारित होईल, अशी तजवीज लष्कराने केली आणि त्यांच्या जागी शाहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड लष्कराने करवून घेतली.


यावेळी निवडणुकीपूर्वी, निवडणूक सुरू असताना सुद्धा पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट, हिंसा, गडबड, गोंधळ झाल्याची वृत्ते कानावर येत होती. निवडणूक गुरुवारी 8 तारखेला असल्यामुळे, निवडणूक नियमानुसार राजकीय पक्षांचा प्रचार मंगळवार 6 तारखेपासूनच बंद झाला होता, तरीही हिंसक प्रकार काही थांबलेले नव्हते. मतदान सुरू होताच, अनेक मतदान केंद्रे उद्ध्वस्त केली गेली, मतपेट्या पळविल्या गेल्या, मतपत्रिका हिसकून घेण्यात आल्या. हे लष्कराच्या मूक (?) संमतीने यावेळी झाले आहे.
उशिराने झालेली 2024ची निवडणूकदि. 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात सार्वत्रिक आणि प्रांतांच्या सभागृहांसाठीही निवडणूक घेतली गेली. वास्तविक पाहता, या निवडणुका अगोदरच व्हायला हव्या होत्या. पण, तेव्हा पाकिस्तानची आर्थिक स्थिती फारच वाईट होती, तसेच लष्कराला नको असलेले आणि अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यामुळे, पदच्युत झालेले इमरान खान हे जनतेत चांगलेच लोकप्रिय होत चालले होते. इमरान खानऐवजी पाकिस्तानच्या संसदेने पंतप्रधान म्हणून निवडलेले शाहबाज खान निवडणुकीत त्यांच्या समोर टिकू शकले नसते. इमरान खान हे पुन्हा पंतप्रधान झाले असते, तर ते लष्कराला आवडले नसते. म्हणून दुसरे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानात परत आणण्यासाठी, विशेष प्रयत्न करण्यात आले. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर, कारावासात न जाता, शरीफ यांनी लंडनला जायचा पर्याय निवडला(?) होता. आता गरज भासल्यामुळे, त्यांना सर्व न्यायालयीन प्रकरणांतून मुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करवून घेतली गेली आणि त्यांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.

इमरान खान यांचे तोशाखाना प्रकरण


समाजमाध्यमांचा वापर करून, इमरान खान यांनी आपली लोकप्रियता वाढवून घेतली होती आणि तशी ती आजही आहे. पाकिस्तानचा तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यात, ते बर्‍याच प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. पुढे ते लष्कराला ते जुमानेसे झाले. हे लष्कराला मानवणे शक्यच नव्हते. त्यातून त्यांनी लष्करातच दोन गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर लष्कराने त्यांना ‘तोशाखाना’ प्रकरणात दोषी सिद्ध करून, त्यांची तुरुंगात रवानगी केली. विदेशी राज्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या, वस्तू तोशाखान्यात (डिपॉझिटरी) ठेवायच्या असतात. इमरान खान यांनी या वस्तू कमी दराने खरेदी करून, जास्त दराने विकल्या होत्या. तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ऐतिहासिक मानला जातो. यानुसार पाकिस्तानचे इमरान खान यांना पाच वर्षांसाठी सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवले गेले. इमरान खान यांच्या सोबत त्यांच्या ‘पाकिस्तान-तेहरीक- ए-इन्साफ’ पक्षाचे अनेक नेते आज तुरुंगात आहेत. काहींनी संभाव्य कारवाईच्या भीतीने देश सोडून, परदेशात आश्रय घेतला आहे, तर आणखी काहींनी राजकारणालाच रामराम ठोकला आहे. इमरान खान यांना निवडणूक लढविता येणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे नवाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग तसा मोकळा झाला होता.


पण, आता नवाज शरीफ यांचे वयवर्ष 74 आहे. ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीएमएल-एन) पक्षाला बहुमत मिळवून देण्यात त्यांचे नेतृत्व यशस्वी होईल का?, अशी शंका सुरुवातीपासूनच घेतली जात होती; पण मदतीला उपाध्यक्षपदी असलेली, कन्या मरियम आहे, ही शरीफ यांची महत्त्वाची बाजू आहे, हेही विरोधक जाणून होते. मरियम नवाज यांच्या मुलाच्या म्हणजे जुनैद सफदर यांच्या लग्नातले फोटो पाहून लोक म्हणाले होते की, नवर्‍या मुलीपेक्षा सासूच जास्त सुंदर दिसत होती. अशा प्रकारे मरियम यांच्या कर्तृत्वाला सौंदर्याचीही साथ मिळाली आहे, तसेच मरियम यांची जनमानसातील प्रतिमा तशी बरीच उजळ आहे. या अनुकूलतेमुळे शरीफ यांची बाजू बळकट मानली जायची.आपण तुरुंगात असताना, स्नानगृहात कॅमेरे लावण्यात आले होते, असा आरोप मरियम यांनी इमरान शासनावर आरोप केला होता. माजी पंतप्रधानांच्या मुलीला जर हे भोगावे लागले असेल, तर इतरांची काय कथा? असा आरोप करून, त्यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती.नवाज शरीफ यांनी देशात परत आल्यानंतर, पाकिस्तानमधील एका सत्कार सभेत सांगितले की, “राजकारणापायी आपण, आपल्या आई आणि पत्नीला मुकलो आहोत. तुमचे प्रेम पाहून मी दुःख विसरलो आहे. पण, काही घाव असे असतात की, ते कधीच भरून येत नाहीत.” आजवर नवाज शरीफ पंतप्रधानपदी तीनदा निवडून आले आहेत खरे; पण लगोपाठ नाही. तसेच पंतप्रधानपदाचा पूर्ण कालावधीही त्यांनी कधीच पूर्ण केला नाही, दरवेळी नशिबी हकालपट्टीच होती. आता ही चौथी वेळ! पक्ष म्हणून विचार केला, तर नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) (पीएमएल) हाच सर्वात मोठा पक्ष ठरतो. कारण, इमरान खान यांचा पक्ष आज अस्तित्वात नाही. त्या पक्षाचे एकेकाळचे सदस्य आणि समर्थक बहुसंख्येने निवडून आले असले तरीही. यावेळी शरीफ आघाडीचे सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले, तर कुरघोडीच्या राजकारणाला पाकिस्तानात आणि पाकिस्तानाबाहेर पूर्णविराम मिळेल का? दुसरी एखादी आघाडी तयार झाली, तरी हा प्रश्न कायम राहतोच. या प्रश्नाचे उत्तर आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाकडे नव्हते. आजही ते असणार नाही. कारण, कळसूत्री बाहुल्यांच्या हाती कधी काही असते का? ते असते सूत्रधाराच्या हाती! आज सूत्रधार आहेत लष्करप्रमुख मुनीर! त्यांच्या मनातले जाणण्यासाठी गरज आहे, एखाद्या जाणकार आणि खर्‍याखुर्‍या मनकवड्याची! तोपर्यंत वाट पाहण्यातच शहाणपणा आहे.

दोघा बंधूंची एकच चूक!

यानिमित्ताने एक तपशील लक्षात घ्यावयास हवा आहे. सुन्नीबहुल पाकिस्तामध्ये शिया व सुन्नी यातील वैर धूमसतच असते. नवाज शरीफ स्वतः सुन्नी असूनही, त्यांनी शिया असलेल्या परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख नेमले होते. मुशर्रफ यांनी शरीफ यांनी काय गत केली, ते सर्वांना माहीत आहे. हे माहीत असूनही शाहबाज शरीफ यांनी मुनीर या दुसर्‍या शियाला लष्करप्रमुख नेमून, एकच चूक दुसर्‍यांदा केली. मुनीर खरे तर बाज्वा यांच्या अगोदर सेवानिवृत्त होणार होते. पण, त्यांना सहा वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. शिया असल्यामुळे सुन्नीप्रधान पाकिस्तान लष्करावर मुशरर्फ यांची किंवा मुनीर यांची फारशी पकड असणार नाही, हा दोन्ही शरीफ बंधूंचा समज पार चुकीचा ठरला.पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून अचानक माघार घेतली. त्यांना आपल्याला बहुमत नाही, याचा साक्षात्कार झाला. एवढेच नव्हे, तर सरकार स्थापनेसाठी शरीफ घराण्याशी आसलेले परंपरागत वैर विसरून ’पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज’च्या (पीएमएल-एन) उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचेही, त्यांनी जाहीर केले आहे. असे साक्षात्कार यापूर्वीही अनेकांना अनेकदा पाकिस्तानात झाले आहेत. हे किंवा असे साक्षात्कार का होत असतात, हे समजण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही/नसावी.

पाकिस्तानच्या निवडणूक निकालामध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानंतर, ’पीपीपी’ आणि ’पीएमएल-एन’ या दोन्ही पक्षांकडून पंतप्रधानपदावर दावा करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे नवाज शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिलावल म्हणाले की, ”सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत मिळवण्यात आमच्या पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे मी पंतप्रधानपदासाठी दावा करणार नाही.” त्यांनी मान्यता रद्द झालेल्या, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ यांच्या समर्थकांबरोबर आघाडी करून सरकार स्थापन करण्यासही नकार दिला. पण, पीएमएल (एन) आणि पीपीपी दोन्ही पक्षांमध्येही अजून वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतभेद आहेत. त्यामध्ये अर्थ, परराष्ट्र, अंतर्गत सुरक्षा या खात्यांचा समावेश प्रामुख्याने आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या पंजाबचा मुख्यमंत्री कोणी व्हावे, शरीफ यांची कन्या मरियम नवाज की आणखी कोणी, याबाबतही त्यांच्यामध्ये एकमत झालेले नाही.प्रारंभी सरकार स्थापनेविषयी ’पीपीपी’मध्ये वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत होती. एक गट विरोधी पक्ष म्हणून बसू असे म्हणत होता, तर दुसरा काहीही करून सत्तेत सहभागी व्हायचेच, असे म्हणत होता. पण, दोन्ही गटांचे मन ‘वळविण्यात’ एक ‘अदृश्य यंत्रणा’च यशस्वी झाली. पण, तरीही या दोन पक्षांच्या सदस्यांची एकूण बेरीज 75+54= 129 इतकीच होते. पण, बाकीच्या सदस्यांची मतेही ‘वळवण्यात’ फारशी अडचण येणार नाही, हे स्पष्ट आहे.

नवाज आऊट, शाहबाज इन!


पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर, पंतप्रधानपदासाठीही अनपेक्षित नाव पुढे आले. पंतप्रधानपदासाठी सुरुवातीपासूनच पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएम-एन) पक्षाचे सर्वेसर्वा नवाज शरीफ यांचे नाव आघाडीवर असतानाच, पक्षाने या पदासाठी नवाज यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली.आता ’पीएमएल-एन’च्या नेतृत्वाखालील प्रमुख राजकीय पक्षांच्या आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीला तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले नवाज शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी हे प्रत्येकी अडीच वर्षे पंतप्रधानपद विभागून घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, बिलावल यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली, त्यानंतर शाहबाज यांच्यासह असीफ अली झरदारी (पाकिस्तान पीपल्स पार्टी), खालिद मकबूल सिद्दिकी (मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान) यांची शुजात हुसैन (पाकिस्तान मुस्लीम लीग (कायदे आझम ग्रुप/कैद) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात सत्तास्थापनेवर एकमत झाले. पण, ‘शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेऊन, आमच्या पक्षाला मिळालेल्या जनादेशावर रात्रीच्या अंधारात डल्ला मारला,’ असा आरोप माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या समर्थकांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सैन्यदलांना आणि ’आयएसआय’ या गुप्तचर एजन्सीला राजकीय विषयात ढवळाढवळ करू नका, तसेच माध्यमस्वातंत्र्यावर मर्यादा घालू नका, असे म्हणत फटकारले आहे. एखाद्या पक्षाची, गटाची किंवा व्यक्तीची कड घेऊ नका, अशी समज न्यायालयाने या दोन्ही घटकांना दिली. यावेळी सैन्यदले आणि गुप्तचर यंत्रणा यांचा राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप कमालीचा वाढला असल्यामुळेच, न्यायालयाने अशी कठोर भूमिका घेतली असावी. त्यामुळे काही काळ तरी लष्कर आणि ‘आयएसआय’ नरमाईचे धोरण स्वीकारतील, असे वाटते.

 
पाकिस्तानात आघाडीचे सरकार स्थापन होईल, असे दिसते. अशा स्थितीत घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यावर आणि आपल्याच पोळीवर तूप पडावे, यासाठी कायम धडपडत असतात. अशा शासनाचे स्वरूप अस्थिर असते. त्यामुळे स्थायी स्वरुपाची बोलणी व करारमदार करणे कठीण असते. त्यातून इमरान खान यांनी आपले समर्थक विरोधात बसून लढा देत राहतील, अशी घोषणा करताच धरपकड, छापे, अपहरण यांसारखी दमनकारी हत्यारे वापरून, इमरान समर्थकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इमरान गटाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ओमर अयूब यांना संसदेत जाऊ तरी दिले जाईल का, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. याचा अर्थ प्रारंभापासूनच संघर्षाला सुरुवात होते आहे. पुढे काय होईल, हे कुणी सांगू शकेल? ‘नृपनीत्रिनेकरुपाः’ असे भर्तृहरीचे नीतिशतक सांगून गेले आहे, ते काही खोटे नाही.



- वसंत गणेश काणे

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121