मुंबई : विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी दि. ७ डिसेंबर रोजीपासून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. मात्र, विविध पक्षांतील आठ आमदारांनी ( MLA ) निर्धारित वेळेत शपथ घेतली नसल्याचे समोर आले आहे. ते जोपर्यंत शपथ घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.
विनय कोरे, जयंत पाटील, उत्तम जानकर, शेखर निकम, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, सुनील शेळके यांनी अद्याप विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही. दि. ७ डिसेंबर आणि दि. ८ डिसेंबर असे दोन दिवस शपथविधीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तर, दि. ९ डिसेंबर हा दिवस विधानसभा अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांच्या अभिभाषणासाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या आठही आमदारांना आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात किंवा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घ्यावी लागेल.
दरम्यान, विशेष अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी १०६ आमदारांनी सदस्यपदाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.