मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे वाल्मिक कराड शरण! सुरेश धस यांची प्रतिक्रिया
31-Dec-2024
Total Views | 131
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वाल्मिक कराड शरण आला, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने मंगळवारी सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, "राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेवटी वाल्मिक कराड यांना सीआयडीसमोर शरण यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी इतके कणखर आणि धडाधड निर्णय घेतल्याबाबत मी त्यांचे आभार मानतो."
"वाल्मिक कराड यांची संपत्ती गोठवण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. लवकरात लवकर सर्व आरोपींची संपत्ती गोठवण्यात यावी. त्याशिवाय आका करत असलेले अन्य गुन्हे उघडे पडणार नाहीत. त्यामुळे त्यांची संपत्ती गोठवलीच पाहिजे. अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल. या प्रकरणात सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे प्रमुख आरोपी आरोपी आहेत. विष्णू चाटे सध्या १२० ब मध्ये आहे. पण त्यानेही व्हिडीओ कॉल करून दाखवला असल्यास तोसुद्धा ३०२ मध्ये येईल. आता शरण आलेले आका हे १०० टक्के १२० ब मध्ये येतीलच पण त्यांनीसुद्ध व्हिडीओ कॉल पाहिला असल्यास तेदेखील ३०२ मध्ये येऊ शकतात. या प्रकरणात ३०२, १२० ब, खंडणी आणि मोक्का हे सगळे गुन्हे आरोपींवर लागणार आहेत," असेही ते म्हणाले.
मुंडेंचा राजीनामा हा अजितदादांचा प्रश्न!
"धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की, नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. या प्रकरणात उज्वल निकम म्हणून सरकारी वकील म्हणून नियूक्ती करण्यात यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. वाल्मिक कराड हे स्वखुशीने शरण आले नसून त्यांची संपत्ती जप्त झाली आणि पोलिस त्यांच्या घरापर्यंत गेले म्हणून शरण आले आहेत. तपासानंतर वाल्मिक कराड हे केवळ खंडणीच्या गुन्ह्यात नाही तर इतर गुन्हेही त्यांच्यावर लागणार आहेत," असेही सुरेश धस म्हणाले.