मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Maharashtra ATS) दहशतवाद विरोधी पथकाकडुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरीक यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. त्यांचेवर करवाई करण्याबाबत विशेष मोहिमदेखील राबविण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यात अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांविरूध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकुण १९ गुन्हे दाखल केले असुन एकुण ४३ अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे व स्थानिक पोलिसांच्या मदतीने विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड व औरंगाबाद या शहरांमध्ये अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला. त्यामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकुण ०५ गुन्हे परकिय नागरिक कायदा १९४६, पारपत्र (भारतात प्रवेश) कायदा १९५०, पारपत्र अधिनियम १९६७ प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ०८ पुरूष व ०१ महिला असे एकुण ०९ अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना, बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्रे इ. भारतीय नागरिकतत्वाची ओळखपत्रे तयार केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास स्थनिक पोलीस ठाणे यांचेकडून करण्यात येत आहे.