मंत्री नितेश राणे : विकास आणि सुरक्षा हे दोन विषय अजेंड्यावर
24-Dec-2024
Total Views |
मुंबई : किनारपट्टीचा विकास आणि सुरक्षा हे दोन विषय माझ्या अजेंड्यावर असून येणाऱ्या दिवसांत सर्वांनाच जिहादीमुक्त किनारपट्टी पाहायला मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी आपल्या खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "विकास करत असताना सागरी सुरक्षा हा फार मोठा विषय आहे. किनारपट्टीवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे आपल्या सुरक्षेत प्रश्नचिन्ह निर्माण होतो. २६/११ सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहेत. आताही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जिहादी मानसिकतेचे लोक व्यवहार करतात. मच्छिमाराच्या नावावर रोहिंगे आणि बांग्लादेशी किनारपट्टीवर वास्तव्य करतात. त्यामुळे देशाला आणि राज्याला अडचण होऊ शकते. या सगळ्या बाबतीतील आढावा घेणार आहे. तसेच हे घुसखोर किनापट्ट्यांवर दिसू नये यासाठी आवश्यक ती कारवाई करु. येणाऱ्या दिवसांत जिहादीमुक्त किनारपट्टी पाहायला मिळेल."
मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, "मत्स्यव्यवसाय व बंदरे या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून किनारपट्टीचा विकास होईल. किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमार बांधवांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी फायदा होईल. बंदरे या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणारा रोजगार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याची संधी माझ्याकडे चालून आली आहे. वाढवण बंदराच्या प्रकल्पाला हातभार लावण्याची संधी मला मिळाली असून त्याचे सोने करण्याचे काम करेल. या दोन्ही खात्यांमध्ये नेमके काय सुरु आहे आणि आपण कुठून सुरुवात करायची या सगळ्या गोष्टींचा आढावा मी बैठकीमध्ये घेतला आहे. या खात्याकडून लोकांच्या फार अपेक्षा आहेत आणि मी मंत्री झाल्याने अजून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकीकडे विकास आणि दुसरीकडे सुरक्षा हे दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहेत," असे त्यांनी सांगितले.
"प्रत्येकाने ग्राऊंडवर उतरून अचानक भेटी दिल्या पाहिजे. त्यावेळी ज्या गोष्टी लक्षात येतील त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. माझीसुद्धा अशा भेटी देण्याची तयारी आहे. माझ्या कारकीर्दीत किनारपट्टीच्या मार्गातून कुणीही देशाकडे किंवा राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धाक माझ्या विभागाचा तयार करणार आहे. हे सगळे आम्ही कायद्यानुसारच करणार आहोत," असेही नितेश राणेंनी सांगितले.
राहुल गांधींनी देशात जातीजातींमध्ये भांडण लावण्याची सुपारी घेतली आहे. हिंदूंना विभागणे आणि त्यांच्यांत भांडण लावणे हे त्यांचे मुख्य काँट्रॅक्ट आहे. त्यांना हिंदू राष्ट्रात फूट पाडायची आहे. महाराष्ट्रात हिंदुंनी एकत्र येऊन मतदान कसे केले, याची त्यांना मिरची लागली आहे. मुसलमान समाजातही तेवढ्याच जाती आहेत. पण राहुल गांधी कधीही त्या जातींचा उल्लेख करताना दिसले नाहीत. मात्र, हिंदूंना वेगवेगळ्या जातींमध्ये विभागून त्यांना तोडण्याचा एककलमी कार्यक्रम राहुल गांधी करत आहेत," असे ते म्हणाले.
संजय राऊतांना टोला!
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, "ज्या संजय राऊतांचा पक्ष स्वत:चा पायावर उभा राहू शकत नाही त्यांनी कुबड्यांची भाषा करू नये. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊनच मुख्यमंत्री झाले आहेत. ते स्वत:च्या ताकदीवर मुख्यमंत्री झालेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्यांच्या कुबड्यांची भाषा करण्यापेक्षा स्वत:च्या मालकाची अवस्था पाहा."