बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेस सरकारने सुईच्या टोकाएवढी जमीनसुद्धा दिली नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षणाला गांधी घराण्याचा कायम विरोध
24-Dec-2024
Total Views |
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानातील आरक्षणाला गांधी घराण्याचा कायम विरोध राहिला आहे. इंदूमिलच्या जागी बाबासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी काँग्रेस सरकारने सुईच्या टोकाएवढी जमीनसुद्धा दिली नाही, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या मुद्यावरून सुरु असलेल्या राजकारणाला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अमित शाह यांचा अर्धवट व्हिडीओ ट्विट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ खराब करण्यासाठी काँग्रेस पक्षाने माफी मागायला हवी. संसदेत बोलत असताना पंतप्रधान मोदीजींनी काँग्रेस पक्षाला उघडे पाडले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानातील आरक्षणाला नेहरूजी, इंदिराजी आणि संपूर्ण गांधी घराण्याचा विरोध राहिला आहे, हे मोदीजींनी पुराव्यासहित जगासमोर आणले. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता नाटक करत आहे. याच काँग्रेस पक्षाने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिले नाही. त्यांना जाणीवपूर्वक पाडले. एवढेच नाही तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झालेल्या इंदूमिलच्या जागी त्यांचे स्मारक व्हावे, यासाठी इतकी वर्षे आंदोलने करावी लागली. पण सुईच्या टोकाएवढी जमीनसुद्धा काँग्रेस सरकारने दिली नाही. मात्र, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदीजींकडे गेलो आणि तीन दिवसांत २ हजार कोटी रुपयांची जमीन त्यांनी राज्य सरकारला दिली. त्याठिकाणी आता बाबासाहेबांचे स्मारक होत आहे," असे त्यांनी सांगितले.
भाजप आणि मोदी सरकारने बाबासाहेबांच्या स्मृती जपल्या!
"लंडनमध्ये ज्याठिकाणी बाबासाहेब शिकले ते घर लिलावात निघाले होते. काँग्रेस सरकारकडे अनेकांनी मागणी केली पण त्यांनी लक्ष दिले नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ते घर घेतले. महू, दिक्षाभूमी, अलीपूर रोड या प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचे काम मोदी सरकार आणि भाजपने केले आहे. काँग्रेसला फक्त त्यांचे नाव वापरून राजकारण करायचे आहे. मात्र, त्यांनी कधीही कुठलाही सन्मान त्यांना दिला नाही. भारतरत्नदेखील त्यांना काँग्रेसने दिलेला नाही," असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी केले.
बीड आणि परभणीच्या घटनेवर सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्र हा देशातील इतर राज्यांपेक्षा सुरक्षित राज्य आहे. प्रत्येक घटनेला इतके राजकीय करणे शोभत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे आणि जातीजातींमध्ये विद्वेष तयार करायचा आहे. तेवढेच त्यांचे काम आहे."
बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही!
मुख्यमंत्र्यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्विकारावे, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीडचे पालकमंत्रीपद कुणी घ्यायचे याबाबत अजितदादा, मी आणि शिंदे साहेब आम्ही ठरवू. पण बीडमध्ये आम्ही कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही."