उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये ३ खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा!
पंजाब आणि उत्तरप्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईला यश
23-Dec-2024
Total Views | 25
नवी दिल्ली ( UP Pilibhit encounter): उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या एकत्रित कारवाईमध्ये ३ खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. पिलभीत जिल्ह्यात २३ डिसेंबरच्या सकाळी या दहशतवाद्यांना संपवण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोघांकडून एके ४७ आणि पिस्तुलं जप्त करण्यात आली आहे. पुरणपूर भागात त्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. आरोपींचे नावं गुरवंदर सिंह (२५) विरेंद्र सिंह (२३) आणि जसप्रीत उर्फ प्रताप सिंह (१८) असून तिघेही गुरूदासपूरचे रहिवाशी असल्याची माहिती माध्यमांना मिळाली.
१९ डिसेंबर रोजी पंजाबच्या कलानौर येथील वडाळा बांगर पोलीस चौकी येथे बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान झिंदाबाद फोर्सने घेतली आहे. महिन्याभरातील ही ८ वी घटना असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणा तैनात असल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. पोलिसांच्या कारवाईत मृत झालेले तीनही आरोपी हे या दहशतवादी संघटनेशी जोडले गेले असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. या तिघांना काही दिवसांपूर्वी बच्छोवाल पोलीस चौकी वर ग्रेनेडने हल्ला केला होता. पिलभीतचे एसपी अविनाश पांडे म्हणाले " आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन्ही आरोपी हे पुराणपूरच्या हद्दीत लपलेले होते. पोलिसांनी त्वरीत नाकेबंदी करत, त्यांच्या पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद करून टाकले. कमरीया भागाजवळ ३ युवक काही संशायास्पद गोष्टी घेऊन चालल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली असता. त्यांच्या जवळ जाताच, त्यांनी आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. त्यांच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देताना पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि त्यातच तिघांचा शेवट झाला.
हल्ल्यानंतर तिघांकडून मोठ्या प्रमाणात विदेशी बनावटीच्या बंदूका जप्त करण्यात आल्या. परदेशातील दहशतवादी संघटनांसोबत त्यांचे लागे बांधे असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. पुढच्या कारवाई बद्दलची सगळी माहिती देण्यात येईल असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले आहे.