हैदराबाद : पुष्पा २ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून रोज नवे विक्रम करतो आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा पुष्पा मात्र आता चांगलाच अडचणीत येणार असल्याचे दिसते आहे. तेलंगणाच्या विधानसभेत बोलताना एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी अभिनेता अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केला आहे.
पुष्पा २ सिनेमाचा प्रीमियर सुरू असताना चेंगराचेंगरी झाली, यानंतर जेव्हा अल्लू अर्जुनला महिलेच्या मृत्यूची बातमी कळली, तेव्हा आता आपला सिनेमा हिट होणार, असे अल्लूने म्हटल्याचे अकबरुद्दीन यांनी सांगितले. अल्लू अर्जुन याची असंवेदनशीलता इतकी की चेंगराचेंगरीनंतरही अल्लूने पूर्ण सिनेमा बघितला असे ते म्हणाले. अल्लू अर्जुनच्या या बेजबाबदार वागण्यामुळे ओवेसी यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. मृत झालेल्या महिलेची त्याने साधी विचारपूस सुद्धा केली नाही. उलट आनंदात गर्दीला हात दाखवत तो थिएटर बाहेर आला. सरकार त्याच्यावर अन्याय करत आहे असे एकीकडे अल्लू म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला तो स्व:ता इतक्या निष्ठुरपणे वागतो, असे अकबरुद्दीन म्हणाले.
ओवेसींच्या या वक्तव्याच्या उलट अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ अनेक राजकीय व्यक्ती समोर आल्या आहेत. भारत राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष के टी रामाराव यांनी अभिनेत्याला अटक केल्याबद्दल तेलंगणातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली.