एकत्रित निवडणुकांवर विचार करणार ३९ सदस्यांची जेपीसी
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार अहवाल
21-Dec-2024
Total Views | 36
1
नवी दिल्ली : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या तरतूदीच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेने शुक्रवारी ३९ सदस्यीय संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ( JPC Members ) स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्षपद माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार पी. पी. चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राज्यसभेत या समितीचे १२ सदस्य नामनिर्देशित करण्याच्या प्रस्तावाला आवाजी मतदानाने मंजुरी मिळाल्याने ३९ सदस्यीय समितीच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. तत्पूर्वी, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'संविधान (१२९ वी सुधारणा) विधेयक, २०२४' आणि 'केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४' संसदेत मांडले. त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद आहे. संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, जो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
या विधेयकांवर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीमध्ये लोकसभेतील २७ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर, लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात समितीच्या सर्व सदस्यांच्या नावांसह समिती स्थापन करण्याची घोषणा केली. समितीच्या ३९ सदस्यांमध्ये १६ भाजपचे, पाच काँग्रेसचे, सपा, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे प्रत्येकी दोन आणि शिवसेना, तेदेपा, जदयु, लोजपा (रामविलास), जनसेना, शिवसेना – उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), माकप, आप, बिजद आणि वायएसआरसीपीचे प्रत्येकी १ सदस्य आहे.
समितीमध्ये रालोआचे एकूण २२ सदस्य आहेत तर विरोधी 'इंडी' आघाडीचे १० सदस्य आहेत. बिजद आणि वायएसआरसीपी हे सत्ताधारी किंवा विरोधी आघाडीचे सदस्य नाहीत. एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर बिजद अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, तर वायएसआरसीपीने या निर्णयाचे समर्थन केले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
अशी आहे जेपीसी
लोकसभेच्या २७ सदस्यांमध्ये भाजपतर्फे पी. पी. चौधरी, सीएम रमेश, बन्सुरी स्वराज, पुरुषोत्तम रुपाला, अनुराग ठाकूर, विष्णू दयाळ शर्मा, भर्त्रीहरी महताब, संबित पात्रा, अनिल बलूनी, विष्णू दत्त शर्मा, बैजयंत पांडा आणि संजय जयस्वाल यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी वाड्रा, मनीष तिवारी आणि काँग्रेसचे सुखदेव भगत यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. समाजवादी पक्षाकडून धर्मेंद्र यादव आणि छोटे लाल, तृणमूल काँग्रेसकडून कल्याण बॅनर्जी, द्रमुककडून टीएम सेल्वागणपती, तेलुगू देसम पक्षाकडून हरीश बालयोगी, शिवसेनेकडून अनिल देसाई (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शप) सुप्रिया सुळे, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे. सेना, लोक जनशक्ती पक्षाकडून (रामविलास) शांभवी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून के. राधाकृष्णन, राष्ट्रीय लोकदलाचे चंदन चौहान आणि जनसेना पक्षाचे बालशौरी वल्लभनेनी यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
राज्यसभेतून या समितीत भाजपचे घनश्याम तिवारी, भुनेश्वर कलिता, के लक्ष्मण, कविता पाटीदार यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जनता दल (युनायटेड)चे संजय झा, काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला आणि मुकुल वासनिक, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले यांचा समावेश आहे. द्रविड मुन्नेत्र, कझगमचे पी विल्सन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, बिजू जनता दलाचे मानस रंजन मंगराज आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही विजय साई रेड्डी यांचा समावेश करण्यात आला आहे.