प्रवासी जल वाहतुकीला गती देणार - केंद्रीय जलमार्ग मंत्र्यांची खासदार नरेश म्हस्के यांना ग्वाही
18-Dec-2024
Total Views | 43
ठाणे : ( Thane ) मुंबई महानगर प्रदेश( एमएमआर) मध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूकीला गती देण्याची ग्वाही केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. अशी माहिती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. खासदार म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट घेत मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जल वाहतुकीद्वारे जोडण्यासाठी निवेदन दिले.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरात होणारे वाढते प्रदूषण लक्षात घेता जलवाहतुकीला चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असुन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) एमएमआर क्षेत्राना प्रवासी जलवाहतूकीद्वारे जोडण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे चार जेटी बांधून मीरा-भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली यांना जोडेल. प्रवासी जलवाहतूक पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी सुरुवातीला वसई खाडी - उल्हास नदीवर चालविली जाणार आहे. या प्रकल्पामुळे एमएमआर मधील नागरिकांना सुलभ प्रवासाचा लाभ मिळून वेळेचीही बचत होणार असल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी दिली.
नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे प्रवासी जलवाहतूक प्रकल्पाची अंमलबजावणी संथगतीने होत आहे. हि सुविधा तयार झाल्यानंतर, राज्य सरकारला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी ऑपरेटर याची आवश्यकता लागेल. मांडवा दरम्यान रो-पॅक्स सेवा तसेच पारंपारिक फेरी सेवेच्या धर्तीवर येथेही या सुविधा सुरू कराव्यात. तसेच हा महत्त्वाचा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय जलमार्ग मंत्री सोनोवाल यांच्याकडे केली आहे. त्यावर या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे खासदारम्हस्के यांनी सांगितले.