३ मिनिटं उशीर झाल्याने उमेदवारी अर्ज मागे नाही; पुण्यात बंडखोरी शमवण्याचा मविआचा प्रयत्न अयशस्वी
05-Nov-2024
Total Views | 110
मुंबई : ( Parvati Assembly constituency ) राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अखेर संपली असून दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली होती. या वेळेपूर्वी अनेक उमेदवारांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मात्र पुण्यामधील एका उमेदवाराला ३ मिनिटे उशिर झाल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही.
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास उशीर झाल्यामुळे पुण्यातील सचिन तावरे यांचा उमेदवारी अर्ज आता कायम राहणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी विनंती करून देखील त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकारामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार सचिन तावरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता दिलेल्या निर्धारित वेळेत ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यास ३ मिनिटं उशीर झाल्याने त्यांचा अर्ज मागे घेता आला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे.
अपक्ष म्हणून अर्ज भरणारे उमेदवार सचिन तावरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. रिक्षा या चिन्हावर तावरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या सगळ्याचा मविआला चांगलाच फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.