मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणून सज्जाद नोमानीला अटक करा!
नितेश राणेंची मागणी
16-Nov-2024
Total Views |
मुंबई : पीएफआय आणि आयएसआयसारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,' असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.
नितेश राणे म्हणाले की, "तालिबान समर्थक सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर करून वोट जिहादचे एक उत्तम उदाहरण दिले आहे. मुस्लिम लॉ बोर्डाचा प्रतिनिधी म्हणून नोमानी वोट जिहादची भाषा करत होते. परंतू, आपल्या देशात राहून हे करण्याची काय गरज? हा माझा प्रश्न आहे. देशात राहून सगळ्या योजनांचा फायदा घ्यायचा आणि तिथेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काढायचा. वक्फ बोर्डच्या नावाने जमिनी लाटायच्या. वक्फ बोर्ड हे कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नसून फक्त आमच्या भारतातच आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसारखा विषय देशात हवाच कशाला? देशात वेगळा कायदा कशाला हवा? ज्याप्रमाणे देशातील अन्य नागरिकांना सोयीसुविधा मिळतात त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा जगायला शिका. फक्त मुस्लिमांसाठी वेगळा पर्सनल लॉ बोर्ड कशाला? या सगळ्यांची हिंदू राष्ट्रात गरज नाही. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणायला हवी."
"सज्जाद नोमानींचा इतिहास तपासल्यास ते तालिबान समर्थक आहेत. जाहीर फतवे काढणारा हा सफेद कॉलर आतंकवादी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कसाबला संपवले तोच नियम या नोमानीला लावायला हवा. देशात राहून ते अशा प्रकारचे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड चालवू शकत नाहीत. वक्फ बोर्डाच्या नावाने जमिनी लाटणे आमच्या महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. पीएफआय, आयएसआयसारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणा आणि नोमानीला अटक करा."
कसाब आणि संजय राऊतांमध्ये काहीच फरक नाही!
"एक हिंदू असूनही संजय राऊतांसारखी माणसे त्यांचे समर्थन करतात. पण ते तुमचे तरी होणार का? त्यांच्या धर्मापलीकडे ते कुणालाही मोजत नाहीत. महाराष्ट्रातील हिंदू समाजासमोर देवेंद्र फडणवीस 'एक है तो सेफ है' ही वस्तुस्थिती मांडत आहेत. हा विचार जर हिंदू समाजाने घेतला नाही, तर उद्या हा नोमानी तुमच्या घरात देवीदेवतांची पूजा करू नका, असे फतवे काढेल. त्यावेळी हा हिंदू समाज कुठे जाणार? हाच विचार देवेंद्रजी आपल्या भाषणात देतात. पण जर संजय राऊत त्यांच्यावर टीका करत असतील तर कसाब आणि संजय राऊतांमध्ये काहीच फरक नाही," अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे.