मुंबई : वांद्रे टर्मिनसवर पहाटे ६च्या सुमारस चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत असताना हा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ जणं जखमी झाली असून, त्यांना जवळच्या भाभा रूगणालयात दाखल करण्यात आला आहे. यातल्या सात जणांची प्रकृती स्थिर आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचा अंदाज प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे. घटना झाल्यावर अवघ्या काही क्षणातच, या बद्दलचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या पोलिस पथकाने त्वरिकत घटनास्थळी धाव घेतली व जखमी झालेल्या लोकांवर प्राथमिक उपचार सुरू केले. या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की "वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पकडताना अचानक गर्दीचा लोंढा वाढला, धक्काबुक्की वाढली आणि त्यात काही माणसं जखमी झाली. रेल्वे स्थानकावर क्षमतेपेक्षा अधिक लोक जमा झाल्याने ही घटना घडली."
वांद्रे टर्मिन्सवर परिस्थिती नियंत्रणात
भाभा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जखमी झालेले प्रवासी साधारण १८ ते ३० या वयोगटातील आहेत. यातील इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेनंतर तत्काळ पोलीस प्रशासनासह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पहाटे ही दुर्घटना घडल्यानंतर काही काळासाठी हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामी करण्यात आला होता. आता मात्र, वांद्रे टर्मिन्समध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे.