मविआत उडी घेण्यासाठी एमआयएम उत्सुक, पण पवारांचा ग्रीन सिग्नल मिळेना!
18-Oct-2024
Total Views | 55
मुंबई : इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत पत्र दिल्याचे एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मविआमध्ये उडी घेण्यासाठी एमआयएम उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "महाराष्ट्रात इम्तियाज जलील यांनी काँग्रेसचे नाना पटोले आणि शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं. आम्हालासुद्धा महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार येऊ नये, असं वाटतं. मी सार्वजनिकरित्या ही गोष्ट बोललो आहे. तीन चार दिवसांपूर्वी आम्ही मनोज जरांगेंसोबतही बोललो. आता त्यांनीच ठरवायचे आहे, पण तरीही आम्ही निवडणूक लढवणार आहोत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्ही पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. आणखी काही उमेदवारांबाबत इम्तियाज जलील यांच्याशी आमची चर्चा सुरु असून आम्ही महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, असा आमचा प्रयत्न आहे," असेही त्यांनी सांगितले.