केपीएमजीच्या सर्वेक्षणात रिमोर्ट वर्किंगबद्दल महत्वाचे खुलासे
17-Oct-2024
Total Views | 45
नवी दिल्ली : बहुराष्ट्रीय कंपनी केपीएमजीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की भारतातील ९० टक्के सीईओंनी वर्क फ्रोम ऑफीसला प्राधान्य दिले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारी बक्षिसे, पदोन्नती, वाढ, आदी गोष्टी सीईओ, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीशी जोडू इच्छितात असे सुद्धा यात नमूद करण्यात आले आहे.
केपीएमजीने आपला सीईओ आऊटलुक सर्वे, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केला. यात असे दिसून आले आहे की, भारतातील बहुतांशी सीईओ, कार्यालयात नियमितपणे हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ देऊन पुरस्कृत करण्यास तयार आहेत. कोविड काळात, रिमोट वर्किंगकडे वळल्यानंतर आता, कंपन्यांकडून पुन्हा एकदा ऑफीस मधील कामाच्या वातावरणात कर्मचाऱ्यांना रुजू करण्याचा मानस या सर्वेक्षणातून समोर आला आहे. कंपनीच्या दीर्घकालीन ध्येयाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण ऑफीस मध्ये तयार झाले पाहिजे असे मत सीईओंनी मांडले.
एआय मुळेच प्रगती!
कर्मचाऱ्यांच्या कौशल्यसंचावर भाष्य करताना अहवालात असे नमूद केले आहे की, येणाऱ्या काळात, जनरेटिव्ह एआय मुळे कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धीतमध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. जनरेटिव्ह एआयच्या माध्यामातूनच उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन येणार असून, यातूनच, प्रगती साधली जाणार आहे. म्हणूनच, भारतातील अनेक सीईओ या तंत्रज्ञानमध्ये गुंतवणूक करण्यात उत्सुक आहे. या सोबत, एआय तंत्रज्ञान जास्ती जास्त सर्वसमावेशक कसे होईल यावर देखील या सर्वेक्षणात भाष्य केले गेले आहे.
केपीएमजीचे हे सर्वेक्षण २५ जुलै ते २९ ऑगस्ट या काळात केले गेले होते. केपीएमजीने एकूण १,३२५ सीईओंची मुलाखत घेतली ज्यातील १२५ सीईओ भारतीय होते.