मुंबई : रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो. या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. व तिथल्या लाकडी मंदिराचे रुपांतर दगडी मंदिरात केले.
पूर्वाभिमुख श्रीगणेशाची हि मूर्ती अरुंद असून तिचे कपाळ मोठे आहे. तसेच सोंड डाव्या दिशेला वळलेली आहे आणि मूर्तीच्या डोळ्यात व नाभीत हिरे जडविलेले आहेत. या मूर्तीच्या मागच्या बाजूला चंदेरी महिरप आहे व त्यावर रिद्धी-सिद्धी यांची कलाकृती साकारली आहे.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
त्रेता युगामध्ये कल्याण नावाचा वाणी त्याच्या पत्नीसमवेत पाली गावी राहत होता. कालांतराने त्यांना बल्लाळ नावाचा पुत्र झाला. बल्लाळ हा लहानपणापासूनच निस्सीम गणेशभक्त होता. त्याची व त्याच्या मित्रांची गणेशावर अपार श्रद्धा होती. ते जंगलामध्ये एका दगडाला गणपती स्वरूप मानून पूजा करीत असत.
एके दिवशी गावकरी कल्याण वाण्याकडे गेले आणि बल्लाळ हा आपल्या मुलांना बिघडवत आहे अशी त्यांनी तक्रार केली. त्यामुळे संतप्त झालेला कल्याण बल्लाळला शोधण्यासाठी रागाने जंगलात निघून गेला. तिथे गेल्यावर कल्याण वाण्याने गणपती म्हणून पुजलेला दगड फेकून दिला. तसेच बल्लाळला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि बल्लाळला एका झाडाला बांधून तो तिथून निघून गेला. तेव्हा बल्लाळने मनाशी ठरवले की जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत गणेशाचा जप चालू ठेवायचा.
बल्लाळ ची निस्सीम भक्ती पाहून गणपती ब्राह्मणाचा अवतार घेऊन त्याच्याजवळ आला. गणपतीने स्पर्श करताच बल्लाळच्या शरीरावरील सर्व जखमा नाहीशा झाल्या. प्रसन्न झालेल्या गणेशाने बल्लाळला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बल्लाळाने इच्छा व्यक्त केली की, गणपतीने इथेच राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. तेव्हा गणपतीने बल्लाळला वचन दिले कि, "माझा एक अंश इथे कायम वास्तव्य करेल व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेल तसेच इथले माझे हे स्थान बल्लाळविनायक म्हणून ओळखले जाईल"असे म्हणून गणपती जवळच्या एका शिळेत अंतर्धान पावला.